बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

जेव्हा वन्यप्राण्यांना नरभक्षक बनवले जाते....

विद्या अत्रेया, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी
ज्या प्रदेशात माणूस आणि प्राणी जवळ जवळ राहतात तेथे आपल्याला अधिक चांगल्या संशोधनाची आणि व्यवस्थापनाची गरज आहे. 

काही दिवसांपूर्वी अमूर फाल्कन या लहानश्या सासाण्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे मथळे व्यापून टाकले होते. हे रेडीओ-टॅग लावलेले पक्षी नागालँडहून दक्षिण आफ्रिकेपर्यंत एका महिन्याहूनही कमी काळात उडत गेले! नद्या, समुद्र, देश, खंड हे सर्व त्यांच्या झेपेसमोर कःपदार्थ ठरले! मानवनिर्मित सीमा या इतर बहुतेक प्रजातींसाठी निरर्थक असतात मुख्यत्वे मोठे प्राणी जसे हत्ती, बिबळे, लांडगे आणि वाघ यांच्यासाठी. एका हत्तीच्या आवाक्यातील क्षेत्र काही शे किलोमीटर्स पर्यंत पसरलेले असते आणि लांडग्यांच्या एका कळपाचा पल्ला २०० किलोमीटर्सपर्यंत. मार्जारवर्गीय मोठे प्राणी शेकडो किलोमीटर चालू शकतात. याचा अर्थ असा कि या प्राण्यांची आनुषंगिक लोकसंख्या आणि कुटुंबे ही हजारो किलोमीटर्सवर पसरलेली असतील. परंतु आज भारताची सरासरी मानवी लोकसंख्या घनता ३०० लोक प्रती चौरस किलोमीटर आहे.
ऐतिहासिक पुराव्यांद्वारे हे सिद्ध झालेले आहे कि वन्य प्राण्यांचे अस्तित्त्व आपल्या भूप्रदेशांवर नेहमीच होते. भूमिपुत्रांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या आपल्या परंपरा आणि पुराण कथांमध्ये वन्य (आणि पाळीव) प्राण्यांना सामावून घेतले आहे. उदाहरणार्थ, वाघोबा – एक मोठा प्राचीन व्याघ्र देव. जो या प्राण्यांना सामायिक भूप्रदेशांवर सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान प्रदान करतो. यामुळे लोकांना या प्राण्यांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास, त्यांना आपल्यांत सामावून घेण्यास आणि याद्वारे स्वतःलाच होणारी हानी कमी करण्यात मदत होते. आता हेही सिद्ध झाले आहे एखाद्या प्रजातीचे विस्तार क्षेत्र  हे फक्त पर्यावरणीय वहन क्षमताच ठरवत नाही तर सामाजिक वहन क्षमतेचीही (सोप्या भाषेत सांगायचे तर सहनशीलतेची) त्यात महत्त्वाची भूमिका असते. जर ही क्षमता जास्त असेल तर ती त्यांना मानवाबरोबर जगतांना टिकून राहण्यास मदत करते.  




वन्य प्राण्यांद्वारे पिकांचे आणि गुराढोरांचे नुकसान होणे ही एक जुनी बाब आहे आणि लोकांनी याची व्यवस्था करण्यासाठी पारंपारिक आणि परिणामकारक उपाय शोधून काढले आहेत. परंतु दुर्दैवाने, आज आपण ज्या पद्धती वापरत आहोत त्या या परंपरांवर आधारित नाहीत त्या जवळजवळ पूर्णपणे फक्त “दूर ठेवा” या एकाच तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, जरी जुने आणि नवीन पुरावे हे सिद्ध करत असले कि बिबटे मानवी वस्तींमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूला नगण्य संघर्षासह राहू शकतात तरी सध्याची पद्धत ही त्यांना त्यांच्या क्षेत्रांमधून काढून जंगलांमध्ये सोडून देण्याची आहे. संशोधनाने हेही सिध्द झाले आहे कि ते परत येतात आणि ते रिकामे प्रदेश परत इतर प्राण्यांनी भरले जातात तरीही हीच पद्धत अवलंबिली जाते. यातील आणखी अस्वस्थ करणारी बाब म्हणजे हे कैद केलेले आणि तणावग्रस्त प्राणी त्यांना सोडलेल्या ठिकाणी मानवावर हल्ला करण्याची शक्यता बळावते. 


अशा प्रकारे आपला हस्तक्षेप, जो प्रजातींच्या जैवशास्त्रावरही आधारित नाही आणि पारंपारिकरित्या भारतीयांनी वन्य प्राण्यांना जसे वागवले त्यावरही आधारित नाही, ही समस्या आणखी बिकट करतो आहे. हत्तींना आगीचा धाक दाखवून पिटाळले जाते. श्रीलंकेमध्ये पृथ्वीराज फर्नांडो यांनी नुकत्याच केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे कि हत्तींना पिटाळ्याने ते अधिक आक्रमक बनतात. जर आपल्याला संरक्षित क्षेत्रांबाहेरचे सर्व वन्यजीव मारून टाकायचे नसतील तर आपल्याकडे मोठ्याप्रमाणात वन्यजीवांना, जे भारताला आपले घर मानतात, आपल्या भूप्रदेशात सामावून घेण्याशिवाय पर्याय नाही. 

याचबरोबर आपल्याला हेही समजून घ्यावे लागेल कि ते माणसांत कसे राहतात आणि त्यांच्या अस्तित्त्वाला माणूस कसा प्रतिसाद देतो. घोसाल आणि इतर यांनी २०१३ मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे कि, भारतात मोठ्या मार्जारवर्गीय प्राण्यांवरील संशोधनावर जैवशास्त्रीय विज्ञानाचा प्रभाव राहिला आहे आणि हे संशोधन मुख्यत्वे संरक्षित क्षेत्रातच केले गेलेले आहे. परंतु समाज, राजकारण आणि अर्थशास्त्र हे सुद्धा संवर्धनाचे परिणाम निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात ज्यांपैकी एकाचाही समावेश जैवशास्त्रीय अभ्यासात केला गेलेला नाही. याशिवाय, वन विभागाकडून संघर्ष शमविण्याच्या कृतींमध्ये सुरक्षात्मक उपायांचा समावेश क्वचितच दिसून येतो, जसे ज्या भूप्रदेशांवर वन्यप्राणी आणि लोकसमूह एकत्रितपणे राहतात त्या लोकसमूहांशी संवाद साधणे आणि मध्यस्थी करणे. जास्तीतजास्त वैज्ञानिक आणि व्यवस्थापकही संघर्ष शमविण्याच्या सुरक्षात्मक उपायांवर भर देतांना दिसत नाहीत जसे पिके आणि गुराढोरांचे अधिक चांगल्याप्रकारे संरक्षण. 
२०११ मध्ये आम्ही कॉलर-आयडी बसवलेली एक वाघीण ताडोबा-अंधारी या व्याघ्र अभयारण्यापासून ४० किलोमीटर दूर, मानवी वापरात असलेल्या भूप्रदेशात कमीतकमी चार महिने राहिली, तिची कॉलर-आयडी काम करणे थांबेपर्यंत. स्थानिक वन कर्मचारी सांगतात कि त्याच भूप्रदेशात आणखीही वन्य प्राणी आहेत आणि ते तेथे प्रजननही करत आहेत. त्या वाघिणीने ४०० चौ.किमी पेक्षाही जास्त प्रदेश व्यापला होता आणि दोन वर्षांनंतर त्याच प्रदेशात एका कॅमेरा-ट्रॅपमध्ये तिचा फोटो निघाला होता. तिचे वर्तन हे पिकांखालील क्षेत्रातील बिबळ्यासारखे होते; ती पूर्ण दिवस बसून राहत असे आणि फक्त अंधार पडल्यावरच सक्रीय होत असे. माणसे तिच्यापासून १०० मीटर्सवर असायची तरी तिने माणसांवर हल्ला केला नाही.
ही बिबट्याची मादी अहमदनगरमधील अकोले गावात राहिली. तिने तेथे आपल्या पिल्लांना जन्मही दिला, आणि गावापासून फक्त १०० मीटर अंतरावर, ऊसाच्या शेतात राहत असूनही ती माणसांपासून दूर राहिली. वन्य प्राणी कशा प्रकारे माणसांना टाळून राहतात याचे ती एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मात्र वर्तमान पत्रांतून याउलट नेहमी हिंसक आणि दुर्दैवी घटनांचेच अधिक वार्तांकन केले जाते. ती दिवसभर आपल्या राहण्याच्या जागी बसून राहत असे आणि फक्त रात्रीच बाहेर पडत असे. तेव्हा ती जिथे जास्त डुकरे आणि कुत्री आहेत अशा गावातील उकीरड्याच्या ठिकाणी जात असे.
वाघांच्या मानवांवरील हल्ल्यांच्या प्रकर्षाने केल्या जाणाऱ्या वार्तांकनात प्रत्येक तज्ञाकडून दिली जाणारी कारणे ही खरतर त्यांची सर्वोत्तम मते असतात याचे कारण मानवी वापरातील भूप्रदेशांत वन्य प्राण्यांचे अस्तित्त्व आणि त्यांची माणसांशी परस्परक्रिया या बाबतीत उपलब्ध असलेल्या माहितीची अल्पता.
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पूर्व महाराष्ट्रात एक तरुण वाघीण भर दिवसा लोकांना मारत होती आणि लोक समूहात असतांनाही त्यांच्यावर हल्ला करत होती. हा असा प्रकार आहे जो एखादा सामान्य वाघ कधीच करत नाही. मग तिने असे का केले? हे आपल्याला माहित नाही आणि कधी माहितीही होणार नाही, जर आपण या वन्य प्राण्यांचे अस्तित्त्व मानवी वापरातील भूप्रदेशांमध्ये स्वीकार केले नाही आणि ते माणसांच्या बाजूलाच राहून कसे जगतात याबद्दल अधिक शिकलो नाहीत तर. भारतीय समाज ज्या प्रचंड वेगाने बदलतो आहे ते पाहता येणाऱ्या काळात मानव-वन्यजीव “सहजीवन” हे अधिकाधिक आव्हानात्मक होत जाणार आहे. याचा उपाय ज्या प्रदेशांत मानव आणि प्राणी शेजारी शेजारी राहतात तेथे अधिक संवेदनशील संशोधन आणि व्यवस्थापनातून शोधणे आवश्यक आहे, ज्यात मानव आणि वन्यप्राणी हे स्वाभाविकपणे विसंगत आहेत हे गृहीत धरलेले नसेल.


लेखिका या महाराष्ट्रस्थित वन्यजीव संरक्षणवादी आहेत.     
खालील संकेतस्थळांवर त्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेता येईल.
www.projectwaghoba.in
www.mumbaikarsforsgnp.com
www.carnivore.in
suryavanshipd@gmail.com
@@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा