बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

पन्नाचं सुवर्णयुग

२०१५ च्या उन्हाळ्यात मध्य  भारतातील जंगलात दोन वाघीण छावे अनाथ झाले....ही त्यांचीच गोष्ट! त्यांच्या येण्याने पन्ना व्याघ्र अभयारण्यात एक अभूतपूर्व क्रांती घडून आली आणि त्यांच्या जाण्याने एका विलक्षण कालखंडाचा अस्त झाला...कसा? जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख 

- पियुष सेक्सारिया  अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

मे २००५ च्या रणरणत्या उन्हाळ्यात, मध्य भारतातील कान्हा व्याघ्र अभयारण्यात एका वाघिणीला एका वाघाने मारून टाकले आणि तिची उण्यापुऱ्या ३० दिवसांची दोन पिल्ले अनाथ झाली. वनविभागाने या पिल्लांचे पालन पोषण केले. ती १८ महिन्यांची झाली असता त्यांना एका मोठ्या बंदिस्त आवारात सोडण्यात आले.
एकीकडे ही बछडी आपले मर्यादित स्वातंत्र्य उपभोगत होती तर दुसरीकडे ३५० किलोमीटर अंतरावर पन्ना व्याघ्र अभयारण्यातील वाघ नाहीसे होत होते/केले जात होते. २००९ पर्यंत या अभयारण्यात एकच वाघ शिल्लक असून इतर सर्वांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन पन्ना व्याघ्र अभयारण्यात व्याघ्र पुनर्स्थापना कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. मार्च २००९ मध्ये बांधवगढ आणि कान्हा अभयारण्यातून अनुक्रमे टी १ आणि टी २ या वाघिणींना आणून पन्नात सोडण्यात आले. परंतु लवकरच पन्नातील शेवटचा वाघही नाहीसा झाला. त्याची बरोबरी म्हणून नोव्हेंबर २००९ मध्ये पेंच व्याघ्र अभयारण्यातून एक वाघ आणून पन्नात सोडण्यात आला, त्याला टी ३ हे नाव देण्यात आले.
या व्याघ्र पुनर्स्थापना प्रकल्पाला बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. पन्नात सोडल्याबरोबर टी ३ ने पेंचच्या दिशेने कूच केली. जवळपास ४१ दिवसांत त्याने ४४२ किमीचे अंतर कापले. त्याला पकडून पुन्हा पन्नात सोडावे लागले. टी ३ ला मोहित करून पन्नामध्येच थांबवण्यासाठी त्याला जेथे सोडायचे त्या भागात वाघिणीचे मुत्र शिंपडण्याची युक्ती लढवली गेली आणि ती यशस्वी ठरली! शेवटी या प्रयत्नांना यश आले आणि ऑक्टोबर २०१० मध्ये टी १ आणि टी २ या दोघींनी बछड्यांना जन्म दिला. या यशाबरोबरच पन्ना अभयारण्याने व्याघ्र संवर्धनात इतिहास घडवला – जगात पहिल्यांदाच पुनर्स्थापित वाघांमध्ये १०० टक्के यशस्वी प्रजनन घडवून आणले गेले.  
यानंतर कान्हामध्ये एका मोठ्या बंदिस्त आवारात मर्यादित स्वातंत्र्य उपभोगत असलेलेल्या त्या दोन वाघीण बहिणींना पुन्हा जंगली बनवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मार्च २०११ मध्ये जवळपास सहा वर्षे वयाच्या त्या दोघींपैकी एकीला पन्नाच्या नैसर्गिक जगात सोडण्यात आले. आधीच्या प्रयोगाच्या यशस्वी अनुभवामुळे यावेळीही टी ३ या वाघाला आकर्षित करण्यासाठी टी ४ च्या मूत्राचा वापर करण्यात आला. पुन्हा तीच प्रचीती आली! लगेचच टी ४ आणि टी ३ चे मिलन झाले. लवकरच टी ४ ने जंगलात शिकार करण्याचे कौशल्यही आत्मसात केले आणि ती स्वतंत्रपणे शिकार करू लागली. नोव्हेंबर २०११ मध्ये तिने आपल्या पहिल्या संततीला, दोन पिल्लांना जन्म दिला. ही सुद्धा एक ऐतिहासिक घटना होती – बंदिवासात वाढलेल्या, माणसांनी पालनपोषण केलेल्या एका वाघिणीने पूर्णपणे जंगली वाघीण बनून जंगलातच पिल्लांना जन्मही दिला होता. टी ४ ला दुसऱ्यांदा संततीप्राप्ती झाली पण तिने या संततीला सोडून दिले. जुलै २०१३ मध्ये तिने तिसऱ्यांदा पिल्लांना जन्म दिला यावेळी तिला तीन पिल्ले झाली.

आपल्या पिल्लांसह टी ४ चे दर्शन अगदी सहज घडून येत असे. त्यावेळच्या तिच्या नऊ महिने वयाच्या बछड्यांसह ओढ्या शेजारच्या सावलीत आराम करतांना किंवा ऐटीत फिरतांना मीही काहीवेळा टी ४ ला पाहू शकलो. त्या बछड्यांनाही आपले कुतुहूल लपवता येत नसे मग तीही आपल्या आईच्या आडून हळूच डोकून पहायची! अशी ही दिमाखदार टी ४ सप्टेंबर २०१४ मध्ये मृत्यू पावली, तिचे बछडे त्यावेळी फक्त १४ महिन्यांचे होते. तिच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक, कदाचित एखादा आजार असल्याचे सांगण्यात आले. एका अद्वितीय जीवनाचा अवेळी अंत झाला. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल कळकळ असणाऱ्या सर्वांना तिच्या बछड्यांची काळजी वाटत असतांनाच त्यांतील एका मादा बछड्याला, पी ४३३ ला (पी:पन्नात जन्मलेली, ४:टी ४ ची संतती, ३:टी ४ ची तृतीय संतती, ३:त्या संततीतील तिसरे बछडे) भूल देऊन, कॉलर लावून आपल्या दोन भावंडांसह स्वतःचे पोट स्वतः भरण्यासाठी सोडून जंगलात देण्यात आले. ही बछडीही आपल्या आईप्रमाणेच धाडसी निघाली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पन्ना आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात त्यांनी आपापली क्षेत्रेही निर्माण केली आहेत.
एकीकडे टी ४ एखाद्या विजयी योद्धयासारखे जीवन जगत असतांना टी ५ हे नवीन नाव धारण केलेली तिची बहिणही आपल्या जीवनाला आकार देत होती. नोव्हेंबर २०११ मध्ये जवळपास साडेसह वर्षे वयाच्या टी ५ ला पन्नात सोडण्यात आले. ज्याला फक्त एक मोठा बंदिवास म्हणता येईल अशा ठिकाणी इतकी वर्षे घालवावी लागल्यानंतरही ती एक अत्यंत चपळ आणि शक्तिशाली वाघीण होती. तिची पहिलीच शिकार, एखाद्या सुस्थापित वाघालाही आव्हान ठरेल असे, रानडुक्कर होते! परंतु तिला पन्नात स्वतःला स्थापित करायला वेळ लागला कारण स्वतःचे क्षेत्र निर्माण करण्यासाठी तिथे आधीच वास्तव्याला असलेल्या वाघांशी तिला बरीच झुंज द्यावी लागली. टी ४ या तिच्या बहिणीला मिळाला तसा जोडीदारही तिला लवकर मिळाला नाही. एप्रिल २०१४ मध्ये तिला दोन पिल्लांच्या स्वरुपात पहिली संततीप्राप्ती झाल्याची बातमी कळाली पण तिने लगेचच त्यांना सोडून दिले. मे २०१५ मध्ये तिने एका पिल्लाच्या स्वरुपात आपल्या दुसऱ्या संततीला जन्म दिला.
टी ५ फारशी नजरेस पडत नसली तरी तिच्या गळ्याला लावलेली कॉलर काम करत असल्यामुळे अभयारण्यातील अधिकाऱ्यांना तिच्यावर लक्ष ठेवता येत होते. ११ जून २०१६ ला फेसबुक पेजवर आलेल्या एका ओळीच्या बातमीने मात्र पन्नाप्रेमींच्या हृदयाचा ठोकाच चुकविला – ती होती, टी ५ च्या मृत्यूची बातमी. वनविभागाकडून सुरुवातीला आलेल्या अहवालांत म्हटले गेले कि ती क्षेत्रप्राप्ती साठीच्या लढाईत गंभीररित्या जखमी होऊन आपल्या गुहेत परतली आणि तिथेच जखमी अवस्थेत तिचा मृत्यू झाला. तिचे पिल्लू जिवंत राहील कि नाही हे आताच सांगणे तसे खूप घाईचे होईल पण असे कळते कि १३ महिन्याचे ते बछडे सध्यातरी चांगले जगत आहे.  
टी ५ ही नेहमीच सावध आणि सहसा कोणाच्याही नजरेस न पडणारी अशीच राहिली. स्थानिक गाईड्सशी बोलतांना माझ्या लक्षात आले कि खूपच कमी जण तिला पाहू शकले होते आणि तिचे छायाचित्र तर बहुतेक कोणालाच घेता आले नव्हते. ती आयुष्यभर एक गूढ म्हणूनच राहिली, थोडीशी पिछाडीवर आणि काहीशी लाजरीही परंतु एक स्वतंत्र वाघीण म्हणून ती आपल्या बहिणीपेक्षा कणभरदेखील कमी नव्हती.
टी ४ आणि टी ५ दोघींना आपल्या वेळेच्या आधीच मृत्यू आला पण त्या जगल्या मात्र अद्वितीय जीवन – ३० दिवसांच्या असतांना आलेला पोरकेपणा त्यानंतर सहा वर्षांहून अधिक काळ सोसावे लागलेले बंदिस्त आयुष्य, पुढे एका अत्यंत धाडसी अशा पुन्हा जंगली बनवण्याच्या प्रयोगाचा, ज्याबद्दल तो यशस्वी होणार नाही असे अनेकांचे ठाम मत होते, भाग बनून एक पूर्णपणे यशस्वी नैसर्गिक जीवन जगणे, पिल्लांना जन्म देणे आणि ते मोठे होईपर्यंत त्यांचे पालनपोषण करणे! व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात कधीच असे घडले नव्हते. मात्र हे घडू शकले ते पन्ना टीमच्या अथक प्रयत्नांमुळे म्हणूनच या यशाचे श्रेय जाते ते पन्ना टीमला.
टी ४ आणि टी ५ ने २००९ मध्ये एकही वाघ शिल्लक न राहिलेल्या आणि आज ३० वाघांचे निवासस्थान बनलेल्या पन्ना व्याघ्र अभयारण्यासारख्या जंगलांचे अफाट सुप्त सामर्थ्याचाच साक्षात्कार घडवून आणला आहे. त्यांनी आपल्या गतकालीन चुका दुरुस्त करण्याची आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याची एक संधी आपल्याला दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वन्यजीवांची आणि संरक्षित क्षेत्रांची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.
पन्नाचे जंगल अत्यंत महत्त्वाच्या पर्यावरणीय सेवा आपल्याला देत आहे ज्यात बारमाही केन नदीला पाणी पुरविण्यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. परंतु प्रस्तावित केन-बेटवा नदीजोड प्रकल्पामुळे त्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे पन्नाच्या जवळजवळ २०० चौ. किमी क्षेत्राचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नुकसान होणार आहे. याचबरोबर १,००० हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित असलेली रिओ टीण्टो हिऱ्याची खाण ही सुद्धा तेवढीच चिंताजनक बाब आहे.
आज टी ४ आणि टी ५ चे सळसळत्या रक्ताचे वंशज या विषमतायुक्त लढ्याला शौर्याने तोंड देत आहेत. त्यांच्या आयांचा आत्मा हा आजही जणू पन्नाच्या जंगलातील खोल दऱ्यांमधून, उभ्या कड्यांवरून, हळुवार ओढ्यांच्या काठांवरून आणि अंधाऱ्या वाटांवरून फिरतो आहे, त्या जणू आपल्याला खडसावून सांगत आहेत पन्नाला पुन्हा गमवू नका नाहीतर....

पियुष सक्सेरिया हे दिल्लीला राहत असलेले एक सल्लागार आणि संशोधक आहेत. Our Tigers Return – Children’s Story Book – The Story of Panna Tiger Reserve (2009-2015) या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.

पन्नातील घटनाक्रमावर एक दृष्टीक्षेप
मे २००५
कान्हामध्ये एका वाघाशी लढतांना वाघिणीचा मृत्यू, मागे तिची ३० दिवसांची दोन पिल्ले अनाथ. वनविभागाद्वारे पिल्लांचे संगोपन, १८ महिन्यांची झाली असता एका मोठ्या बंदिस्त आवारात सोडले
२००९
एक नर वाघ वगळता पन्नातील सर्व वाघांचा मृत्यू झाल्याचे घोषित.
मार्च २००९
बांधवगढमधून टी १ आणि कान्हामधून टी २ या वाघिणींना आणून पन्नामध्ये सोडले

पन्नातील एकुलता एक वाघही नाहीसा झाला
नोव्हेंबर २००९
पेंचमधून एक नर वाघ टी ३ आणून पन्नात सोडला. टी ३ चे ४१ दिवसांत पेंचच्या दिशेने ४४२ किमी मार्गक्रमण
२६ डिसेंबर,२००९
टी ३ ला पुन्हा पकडून पुन्हा पन्नात सोडले
१६ एप्रिल,२०१०
टी १ ला ४ पिल्लांच्या स्वरुपात प्रथम संततीप्राप्ती
ऑक्टोबर २०१०
टी २ ला प्रथम संततीप्राप्ती
पन्नाची ऐतिहासिक उपलब्धी, जगात पहिल्यांदाच पुनर्स्थापित वाघांच्या प्रजननात १००% यशप्राप्ती.
मे २०११
कान्हात अनाथ झालेल्या दोन बहिणींपैकी एक, टी ४ ला पन्नात सोडले.
नोव्हेंबर २०११
२ पिल्लांच्या स्वरुपात टी ४ ला प्रथम संतोनोत्पत्ती
मार्च २०१३
टी ४ ला दुसऱ्यांदा संततीप्राप्ती, तिच्याकडून पिल्लांना सोडून देणे.
जुलै २०१३
३ पिल्लान्च्यास स्वरुपात टी ४ ला तिसऱ्यांदा संततीप्राप्ती
सप्टेंबर २०१४
टी ४ चा मृत्यू
नोव्हेंबर २०११
कान्हामध्ये अनाथ झालेली दुसरी वाघीण, टी ५ ला पन्नात सोडले.
एप्रिल २०१४
२ पिल्लांच्या स्वरुपात टी ५ ला प्रथम संततीप्राप्ती
मे २०१५
१ पिल्लाच्या स्वरुपात टी ५ ला दुसऱ्यांदा संतानोत्पत्ती
पुन्हा इतिहास घडवला, जगात पहिल्यांदाच बंदिस्त आवारात वाढलेल्या अनाथ वाघिणी फक्त जंगली वाघीणीच बनल्या नाहीत तर त्यांनी यशस्वीरित्या पिल्लांना जन्मही दिला
१ जुन २०१६
टी ५ च्या मृत्यूची बातमी

पन्ना हा एक अत्यंत प्राचीन भूप्रदेश असून येथे आजही मध्यभारतातील डोंगराळ भागांचे मुख्य शासक असलेल्या गोंड काळातील अवशेष सापडतात.
पन्ना देशातील बाविसावे आणि मध्यप्रदेशचे पाचवे व्याघ्र अभयारण्य आहे. हे अभयारण्य विंध्य पर्वतमालेत वसलेले असून राज्याच्या उत्तरेत पन्ना, छतरपूर आणि दामोह जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. पन्ना राष्ट्रीय उद्यानाची स्थापना १९८१ मध्ये केली गेली. १९९४ मध्ये भारत सरकारने पन्नाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले. हे राष्ट्रीय उद्यान आधीच्या गंगाऊ वन्यजीव अभयारण्य क्षेत्रांचे  मिळून बनलेले आहे. या उद्यानातील काही क्षेत्रे पूर्वीच्या काळी पन्ना, छतरपूर आणि बिजवार प्रांताच्या राजांना शिकारीसाठी आरक्षित ठेवलेली होती.
पन्ना राष्ट्रीय उद्यानाला कसे जाता येईल...
भूमार्ग : पन्ना राष्ट्रीय उद्यानाला रस्त्याने सर्वांत जवळचे बसस्थानक पन्ना शहर आहे जे खजुराहो, सतना आणि मध्यप्रदेशातील अनेक ठिकाणांशी जोडलेले आहे. खजुराहोपासून २४ किमीवर असलेले मडला हे एक चांगले वाहतूक केंद्र आहे. येथून पन्ना राष्ट्रीय उद्यानाला जाण्यासाठी बसेस आणि वाहतुकीची इतर साधने उपलब्ध आहेत.
लोहमार्ग: सतना हे पन्ना राष्ट्रीय उद्यानापासून सर्वांत जवळचे रेल्वे स्टेशन आहे. राज्य आणि देशातील सर्व मोठ्या शहरांशी आणि विशेषतः मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागांशी हे स्थानक जोडलेले आहे. मुंबईहून दररोज सतना जाणाऱ्या गाड्या – कामयानी एक्सप्रेस, महानगरी एक्स्प्रेस, राजेंद्रनगर एक्स्प्रेस, कोलकता मैल, LTT RJPB Exp. आणि गोरखपूर एक्स्प्रेस. दिल्लीहून महाकोशल, NDLS Rewa Exp. तर बेंगालुरूहून संघमित्रा आणि चेन्नईहून वाराणसी एक्स्प्रेस.
हवाईमार्ग: पन्ना राष्ट्रीय उद्यानापासून सगळ्यात जवळचे विमानतळ म्हणजे खजुराहो (IATA code: HJR), येथून पन्ना ४५ किमी अंतरावर आहे. खजुराहो वाराणसी विमानतळाशी थेट जोडलेले आहे. खजुराहोहून वाराणसीमार्गे विमानाने दिल्लीला जाता येते.   

Ref :

  
The Indian Express च्या Eye या रविवारीय साप्ताहिकात प्रथम प्रकाशित

 @@@@

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा