बुधवार, २१ जानेवारी, २०१५

पंकज सेक्सारिया : एक संवेदनशील संशोधक

पंकज सेक्सारिया हे एक संशोधक, लेखक, फोटोग्राफर, अभ्यासक आणि पर्यावरण क्षेत्रातील सक्रीय कार्यकर्ते आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी व्यापक स्वरूपाचे काम केले आहे, विशेष करून अंदमान आणि निकोबार बेटांच्या संबंधात. या बेटांसंबंधित विषयांवर ते १९९८ पासून इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये नियमितपणे लिहित आहेत. त्यांनी या बेटांवर आधारित दोन ललितेतर पुस्तके Troubled Islands (2003; पत्रकार म्हणून त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह) आणि The Jarawa Tribal Reserve Dossier: Cultural And Biological Diversity in the Andaman Islands (Jt.Editor 2010) ही लिहिली आहेत.
गेल्या १२ वर्षांपासून ते कल्पवृक्ष या पर्यावरण अॅक्शन ग्रुपशी जोडलेले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये अजूनही असलेल्या समस्यांबद्दल त्यांना काळजी आहे आणि त्या सोडविण्यासाठी ते आपले व्यापक संशोधन, कायदेशीर हस्तक्षेप, प्रचार पत्रकारिता आणि आपल्या नेटवर्किंगद्वारे सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपली मास्टर्स डिग्री जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली येथून पूर्ण केली आहे आणि सध्या ते मास्ट्रीच युनिव्हर्सिटी (Maastricht University, Netherlands), नेदरलँड्स येथून सायन्स, टेक्नोलॉजी अॅन्ड सोसल स्टडीज मध्ये पीएचडी करत आहेत.
नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांवर आधारित त्यांची एक कादंबरी “द लास्ट वेव्ह” हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स, इंडिया कडून प्रकाशित करण्यात आली आहे. वास्तविकतेचा भक्कम पाया असलेल्या या कादंबरीला टीकाकारांकडून भरपूर प्रशंसा प्राप्त होत आहे आणि देशभरातील वाचकही तिच्या प्रेमात पडले आहेत. तर जाणून घेऊयात पंकज यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांच्या कादंबरी विषयीही. 
१. मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर पारंपारिक मार्गाने न जाता पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्ही मास कम्युनिकेशन या विषयाची निवड केली आणि नंतर तुम्ही पर्यावरण आणि वन्यजीवांसंबंधित विषयांकडे आकर्षित झालात, हे कसे?
बघ अस आहे कि मला इंजिनीरिंगच करायचं अस काही मुख्य आकर्षण नव्हत. पर्यावरण आणि वन्यजीव यात माझी रुची आधी पासूनच होती. मी नववी दहावीला असतांनाच मला पक्षी निरीक्षण इत्यादीची आवड निर्माण झाली होती. ही आवड निर्माण होण्यात पियुषचा मोठा हातभार होता कारण माझ्याही आधीपासून त्याला या विषयात आवड होती. माझी बारावी झाली तोपर्यंत पर्यावरण आणि वन्यजीव या विषयात माझी रुची खूप वाढली होती. परंतु त्यावेळी म्हणजे २० वर्षांपूर्वी बारावी नंतर पर्यावरण या विषयात शिकायचं असेल तर पदवी स्तरावर काही फारसे करता येण्यासारखे नव्हते. आजकाल खूप पर्याय आहेत पण त्यावेळी काहीच नव्हते. माझ्या वडिलांसह इतरही बऱ्याच जवळच्या लोकांचे असे म्हणणे होत कि तुला नंतर जे करायचं असेल ते तू कर परंतु डिग्री करायची तर अशी डिग्री कर ज्याचा काहीतरी फायदा होईल. मला पर्यावरण या विषयात काम करायचे आहे असे माझे त्यावेळीही ठरलेलेच होते म्हणून मी इंजिनीरिंग केले परंतु इंजिनीरिंग करून काही मार्ग बदलला वगैरे असे काही नाही. माझी या विषयात विशेष रुची निर्माण होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मी अकरावीत असतांना आपल्या महाराष्ट्रात पश्चिम घाट वाचविण्यासाठी एक “पश्चिम घाट बचाव” मोहीम झाली होती. या मोहिमेंतर्गत पश्चिम घाट बचाव मोर्चा असा एक मोर्चा ही काढण्यात आला होता. पश्चिम घाट ही एक खूपच महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी पर्यावरणीय प्रणाली (इकोलोजिकल सिस्टम) आहे. त्यात जंगलं आहेत, अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत, लोकही राहतात. तर या परिसंस्थेची काय परिस्थिती आहे याचे निरीक्षण करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, पत्रकार अशा लोकांनी एक प्रकल्प हाती घेतला. यात पश्चिम घाटात काय होते आहे हे समजून घेण्यासाठी एक मार्च काढण्याचे ठरले. यात १०० दिवसांचा मार्च करायचा असे ठरले. काही लोकांनी पश्चिम घाटाच्या उत्तर टोकाकडून म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून आणि काही लोकांनी दक्षिण टोकाकडून म्हणजे केरळ आणि तामिळनाडूच्या सिमांवरून हा १०० दिवसांचा मोर्चा काढायचा. उत्तरचा गट दक्षिणेकडे येणार आणि दक्षिणेचा गट उत्तरला येणार आणि १०० दिवसांनी त्यांची गोव्याला मिटिंग होईल. त्यावेळी मी दहा दिवसांसाठी महाबळेश्वर ते पाटण दरम्यान या मोर्चात सहभागी झालो होतो. या मोर्चात अनेक लोकांशी पश्चिम घाटाबद्दल बोलणे झाले, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले. यावेळी पश्चिम घाट काय आहे, तेथील परिस्थिती कशी आहे याचा मला खूप जवळून, वैयक्तित पातळीवर अनुभव घेता आला. हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता ज्यामुळे मी खूपच प्रभावित झालो होतो. याच दरम्यान पुण्यातही आम्ही छोटे मोठे कार्यक्रम सुरु केले होते. त्यावेळी नर्मदा बचाव आंदोलनचेही पुण्यात बरेच काम चालायचे. विध्यार्थी दशेत आम्ही एखादा मोर्चा किंवा थोडे निधी संकलन इत्यादीच्या निमित्ताने आम्हाला शक्य होईल तेवढा हातभार या आंदोलनाला लावत होतो. हे अनुभव खूप मोठे होते. पर्यावरण काय आहे, विकास काय आहे. “Whose development at whose cost” हा जो प्रश्न विचारला जात होता यामुळे शिकण्याची एक खूप चांगली संधी मिळाली. मग इंजिनीरिंगच्या काळातही हे सगळे असेच चालू राहीले. वन्यजीवन पाहण्यासाठी खूप भटकंती, खूप पक्षीनिरीक्षण इत्यादी केले.  
दुसरे महत्त्वाचे असे कि माझे काही पाच सात मित्र होते ज्यांच्याशी माझा या विषयावर खूप पत्रव्यवहार व्हायचा, त्याकाळात ईमेल वगैरे असे काही नव्हते. यात खूप मोठी म्हणजे १५-१५, २०-२० पानांची पत्रे आम्ही एकमेकांना लिहायचो. यात आम्ही पर्यावरण या विषयात काय आव्हाने, काय समस्या आहेत यावर एकमेकांचे विचार व्यक्त करायचो. आता हा पत्रव्यवहार चालू असतांना माझे जे काही मित्र मैत्रिण होते ते म्हणायचे कि तू खूप छान लिहतोस, तुझे पत्र कधी येते आणि आम्ही कधी ते वाचतो असे आम्हाला होते. यामुळे मला असे लक्षात आले कि आपण बऱ्यापैकी लिहू शकतो. माझी लिहिण्यातही रुची निर्माण झाली. मग मी असा विचार केला कि पर्यावरण आणि कम्युनिकेशन यांच्या इंटरसेक्शनवर काहीतरी काम करायचे. म्हणून मी इंजिनीरिंग झाल्यानंतर मास कम्युनिकेशनला गेलो परंतु याचवेळी मी हेही ठरवले होते कि मी फक्त पर्यावरणाशी संबंधितच काम कम्युनिकेशनच्या क्षेत्रात करणार कारण त्या क्षेत्रात इतर संधी खूप होत्या पण मला तिकडे जायचे नव्हते.
२. संपादक, फोटोग्राफर, संशोधक, पत्रकार, आंदोलक आणि अकॅडमिक – तुमचे व्यक्तिमत्त्व असे अष्टपैलू आहे. इतक्या सगळ्या गोष्टी करणे तुम्हाला कसे काय शक्य होते?
कस करतो ते सांगण खूप अवघड आहे. खर म्हणजे व्यापक दृष्टीने बघितले तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्याच आहेत म्हणजे बघ ज्याविषयावर मी संशोधन करतो त्याच विषयावर मी फोटोग्राफी करतो त्याच विषयावर मग मी लिहितो, तेच विषय संपादनाचेही असतात. थोडक्यात हे एखाद्या जिग्सो पझल सारख असत ज्यात इकडचे तिकडे बसते. म्हणजे यात मेहनत करावी लागते पण खूप मेहनत करावी लागते असे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त आवश्यक वाटते. मी जेव्हा एकाद्या कामाला लागतो तेव्हा त्यावर पूर्ण एकाग्रता मला करता येते. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एकच गोष्ट करत राहिलो कि एका बाजूला तर त्यात आपल्याला खूप बोरिंग होते पण त्याचवेळी ते काम आपण करत राहिलो तर ते करण्याची आपली कार्यक्षमता, आपले कौशल्य वाढते. मी हे सगळ कस करतो याचा  काही एक फिक्स फोर्मुला मला सांगता येणार नाही पण मला अस वाटत कि केल पाहिजे आणखी करण्याची आवश्यकता आहे.
So many fingers. Sea Anemones, Havelock Island
३. अभ्यास आणि कामासाठी तुम्ही देशातील इतर कोणत्याही भागाऐवजी अंदमान आणि निकोबार बेटांचीच निवड का केली?
निवड अशी केली नाही. माझी इंजिनीरिंग संपल्यावर जवळपास ६ महिने मला काही काम नव्हत. खर म्हणजे इंजिनीरिंगच्या आठही सेमिस्टरमध्ये मी कधीही पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो नव्हतो. तर शेवटच्या वर्षीही काहीतरी एक तोंडी परीक्षा (व्हायवा) बुडाली होती आणि जवळपास ६ महिने काही नव्हत करायला. त्यावेळी माझा एक खूप चांगला मित्र, ज्याच्यामुळे आम्ही पक्षी निरीक्षण वगैरे सुरु केले, तो आधी आयआयटी मुंबईला होता आणि नंतर त्याला नेव्ही मध्ये जॉब लागला आणि त्याची पोस्टिंग पोर्ट ब्लेअरला होती. तो मला म्हणाला तू जर रिकामा असशील तर येथे ये, दोन एक महिने आपण येथे फिरू, बोलू. ही एक खूप चांगली संधी होती म्हणून मी तिकीट काढून गेलो पोर्ट ब्लेअरला. या गोष्टीला आता २०-२१ वर्ष झाली. १९९३ च्या हिवाळ्यात मी गेलो होतो, काही काम नसल्यामुळे मी खूप भटकलो, अंदमानच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, खूप चांगले चांगले अनुभव आले - कासवे, कासवांचे नेस्टिंग, तिथले जंगल, तिथला बीच, तिथला समुद्र इत्यादी पाहिले तिथल्या लोकांना भेटलो. तिथले सौंदर्य आणि तिथल्या समस्या यांची थोडी ओळख झाली, माहिती मिळाली. तेथे काही दोनचार लोक होते जे पर्यावरणाशी संबंधित काम करत होते त्यांच्याशी संबंध आला. मग या जागेबद्दल खूप आवड निर्माण झाली. पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रात काम करत असल्यामुळे येथील सौंदर्य आणि समस्यांची थोडी जाणीव झाली आणि असे वाटू लागले कि आपण तेथे जावे आणि काम करावे. तेथील वास्तव्याचे दोन महिने संपल्यावर मग मी पुण्याला परत आलो, इंजिनीरिंग पूर्ण केले आणि मग मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी मी दिल्लीला गेलो. दिल्लीला कल्पवृक्ष संस्था होती, अजूनही आहे पण त्यावेळी ती पुण्याला नव्हती. या संस्थेचे काही सदस्य अंदमान मध्ये काम करत होते, मी अंदमानला जाऊन आलो होतो म्हणून येथेही त्यांच्याशी संपर्क झाला. त्या संस्थेचा मी सदस्य झालो. त्यांच्याबरोबर अंदमान आणि इतरही विषयांवर काम सुरु केले. मला नेहमी अंदमान आणि निकोबार बेटांवर परत जावे, तेथे काम करावे असे वाटायचे. माझे पदव्युत्तर शिक्षण जेव्हा संपले तेव्हा कल्पवृक्ष बरोबर अंदमान निकोबारला पर्यावरण निरीक्षणासाठी जाण्याचा एक प्रकल्प मुंबईच्या BNHS (बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी)कडे मंजुरीसाठी आम्ही पाठवला होता. एका वर्षानंतर तो प्रकल्प मंजूर झाला आणि पैसे आले. मग १९९७-९८ मध्ये मी परत अंदमान निकोबारला गेलो. यावेळी ६ महिन्यांसाठी गेलो, तेव्हा दोन-तीन मुद्यांवर अनुसंधान करायचे असे होते.
थोडक्यात तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मला ती जागा खूप आवडली, मी तेथे थोडे काम सुरु केले आणि जसे एखाद्या विषयावर काम सुरु केल्यावर माणूस त्यात आणखी आणखी पुढे जात जातो तसे मी त्यात गुंतत गेलो. काही मुद्दे असेही होते ज्यांसाठी आम्ही कोर्टात गेलो. पर्यावरणाचे, तेथील आदिवासींच्या अधिकाराचे मुद्दे यांबद्दल ट्रबलड् आयलंड मध्ये मी खूप काही लिहिले आहे, त्याचवेळी मी वर्तमानपत्रातदेखील लिहित होतो. यासाठी मग फोटोग्राफ्स काढणे, लोकांशी बोलणे, तपासणी करणे इत्यादींसाठी जावे लागत होते. आपण इंग्रजीत one led to the other असे म्हणतो ना तसे मग हे काम सुरु राहिले आणि आज २० वर्षे झाली मी हे काम करतो आहे.  
जायंट रॉबर क्रॅब, साउथ सेंटीनल बेट
४. त्याच वेळी मग तुम्ही कल्पवृक्ष पुण्यात पण सुरु केली.....
मी सुरु केली नव्हती. कल्पवृक्षचे सदस्य काही वैयक्तिक कारणांसाठी पुण्याला स्थलांतरित झाले होते. त्यांनी पुण्याला ही कल्पवृक्ष संस्था सुरु केली होती. ते आल्यानंतर ६ महिन्यांनी मी ही माझे शिक्षण संपल्यावर पुण्याला आलो. आणि या संस्थेशी एक संशोधक म्हणून जोडला गेलो.
५. कल्पवृक्ष फक्त अंदमान निकोबार बेटांवरच काम करते कि इतरही विषयांवर?
कल्पवृक्ष या संस्थेच खूप मोठ काम देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चालते. कल्पवृक्ष मुख्यत्वे पर्यावरण संरक्षण आणि मानवी हक्क किंवा सामाजिक समानता या मुद्द्यांवर काम करते. या संस्थेचे मानणे आहे कि जर पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समानता या दोन्ही गोष्टींना आपण बरोबर घेतले नाहीत तर समाजाचा किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही. आपण फक्त पर्यावरण संरक्षण केले आणि गरीब, आदिवासी यांच्या अधिकारांचे हनन केले तर तेही चालणार नाही आणि विकास करण्यासाठी पर्यावरणाचा नाश करूनही चालणार नाही.
कल्पवृक्ष संस्थे अंतर्गत अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवर काम करत असतात. मोठे बांध (जसे नर्मदा बचाव आंदोलन), कम्युनिटी कन्झर्वेशन(छोटे गाव, आदिवासी समूह यांच्या पातळीवर घेतले गेलेले छोटे छोटे पुढाकार), पर्यावरण शिक्षण, अनुसंधान, कम्युनिकेशन अशी बरीच कामे या संस्थेच्या छत्राखाली चालतात. मी अंदमानवर काम करतो बाकीचे लोक इतर विषयांवर काम करतात काही लोक शिषण, धोरणे इत्यादी विषयांवर काम करतात.
ही संस्था तशी खूप मोठी वगैरे नाही परंतु काम करणारी माणसे आपल्या कामाप्रती खूप समर्पित आहेत आणि वर्षानुवर्षे काम करत आहेत म्हणून ते काम खूप मोठ दिसत.
प्लायवुड-मिल
६. अंदमान ट्रंक रोड बंद न करता येथील अधिकाऱ्यांनी चालविलेला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान, पर्यटकांकडून जारावांना मिळणारी असंवेदनशील वागणूक इत्यादींकडे पाहता या बेटांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. ही बेटे, येथील पर्यावरण आणि येथील आदिवासी लोक यांना वाचविण्यासाठी गेली २० वर्षे तुम्ही करत असलेले अथक आणि सततचे प्रयत्न खरोखर प्रशंसनीय आहेत. आजूबाजूला अशी अत्यंत निराशाजनक परिस्थिती असतांना अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला प्रेरित करते आणि तुमची आशा जिवंत ठेवते.  
परिस्थिती थोडी निराशाजनक आहे परंतु जगात चांगल्या, सकारात्मक गोष्टीही खूप आहेत. आपल्या आजूबाजूला खूप लोक खूप संघर्ष करत असतात. मला अस वाटत कि जन्मापासून मी खूप भाग्यवान राहिलो आहे. मला कशाची कमतरता अशी कधी जाणवली नाही. आणि जर आपल्याकडे संधी आहेत, आपण सक्षम आहोत तर आपण काम करायला पाहिजे. म्हणजे मी शिकलोय, मला लिहिता येते, मला आवड आहे तर एकीकडे जेथे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तशा नसाव्यात, काय करणार, पण दुसरी कडे अशाही गोष्टी आहेत ज्या सुंदर आहेत, बघण्यासारख्या आहेत करण्यासारख्या आहेत आपण त्या करत राहाव्यात अस मला वाटत. गेल्या वीस वर्षांत अंदमानात खूप चांगले अनुभवही मला आलेले आहेत. माझी जगात सगळ काही बदलून टाकाव, क्रांती आणावी अशी काही इच्छा नाही परंतु छोटे छोटे बदल घडवून आणावेत आणि आपण ते घडवून आणू शकतो यावर माझा विश्वास आहे.
आताच माझी एक कादंबरी प्रकाशित झाली आहे. ती लिहिण्यामागचेही एक कारण म्हणजे मला वाटत कि या जगात असे बरेच लोक आणि त्यांच्या गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते पण माहिती असायला हवी. आणि एक लेखक म्हणून मला असे वाटते कि माझी ती जबाबदारी आहे कि त्या गोष्टी मी इतर लोकांना सांगाव्यात. एक पत्रकार म्हणूनही मी जेव्हा एखादी घटना किंवा गोष्ट लिहायचो तेव्हा मला नेहमीच वाटायचे कि मला का ही गोष्ट लिहायची आहे तर, ही गोष्ट महत्त्वाची आहे, ती लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे, त्यांना माहित होणे महत्त्वाचे आहे. तर सांगायचे तात्पर्य असे कि निराशा असते हे खरे आहे पण आपल्याला काय करता येईल ते आपण करावं हाच माझा अनेक वर्षांपासूनचा दृष्टीकोण राहिला आहे.
लाकडाचा मोठा ओंडका आणि हत्ती
७. या बेटांवरील तुमचे पहिलेच काल्पनिक लेखन – तुमची आताच प्रकाशित झालेली कादंबरी, द लास्ट वेव्ह ला टीकाकारांकडून चांगली प्रशंसा मिळाली आहे. या कादंबरीकडे तुमचे एक मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. तुम्हाला काय वाटते? एक कादंबरी लिहिणे हे एक पत्रकार म्हणून लिहलेल्या लेखांपेक्षा अधिक परिणामकारक आहे?
ही कादंबरी किती यशस्वी झाली आणि किती नाही हे मला माहित नाही. पण इतक्यात तिचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न आहेच. चांगली विक्री होते आहे, चांगला प्रतिसाद मिळतो आहे हे खर आहे पण कोणत्या मानकांवर मूल्यमापन करायचे हा ही प्रश्न आहे. हे खूप मोठ यश आहे अस मला अजून तरी सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या यशाचे दोन मानांकन आपण विचारात घेऊ शकतो एक म्हणजे विक्री किती होते आहे आणि दुसरे म्हणजे टीकाकार, वाचक काय म्हणत आहेत. दोन्ही बाबतीत या कादंबरीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. परंतु येणाऱ्या काळातच आपल्याला खरे काय ते समजेल. खर म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे या प्रकारची पुस्तके कमी आहेत.
द लास्ट वेव्ह
पुस्तक का लिहिले याबद्दल तुला थोड सांगितलं कि तुझ्या लक्षात येईल. झाल अस कि आम्ही आदिवासींच्या हक्कांसाठी काम करत होतो. २००२ मध्ये आम्ही दाखल केलेल्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून अंदमान ट्रंक रोड बंद करावा असा आदेश आला होता, याच बरोबर इतरही काही आदेश आले होते. आजही, बारा वर्षांनंतरही त्या आदेशाचे पालन झालेले नाही. हे पुस्तक मी २००५-०६ मध्ये लिहलेले आहे. २००२ ते २००५ ही दोन-तीन वर्षे आम्ही खूप प्रयत्न केला होता, कि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही आहे. या आपल्या लोकशाही असलेल्या देशात या पेक्षा पुढे जाऊन आपण काय करू शकतो, सर्वोच्च न्यायालयात जाऊन मिळालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तर आपण यापेक्षा जास्त काय करू शकतो. तर एका मानाने ते न होण हा खूपच निराशाजनक अनुभव होता. यावेळी आम्हाला अपयश आले असे मला वाटत नाही तर आपली व्यवस्था, सिस्टम अपयशी झाली असे मला वाटते. आता याला अपयश म्हणायचं तर आपण अपयश म्हणू पण त्याला माझी प्रतिक्रिया अशी होती कि पुढे आपण काय करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला, कितीतरी लेख लिहिले, प्लानिंग कमिशन (योजना आयोग)कडे दाद मागितली, अशाप्रकारे आम्हाला करता येण्यासारख सर्वकाही आम्ही केल परंतु आम्हाला यश लाभल नाही. मग मी असा विचार केला कि मला मोठ्या वाचकवर्गाकडे जाता येईल का? त्यासाठी मग मला वाटले कि मला कादंबरी लिहिता येईल. सत्य परिस्थितीवर आधारित तरीही एक काल्पनिक गोष्ट लिहिता येईल. तर हा म्हणजे एक प्रकारचा प्रतिसाद होता. अस नाही कि कादंबरी लिहिल्याने सर्वकाही ठीक होईल परंतु आपण हे सगळ केल आहे मग हे पण करून बघू या असा त्या मागचा विचार होता. एका दृष्टीने ही कादंबरी म्हणजे माझ्या लिखाणाचाच पुढचा एक भाग होती. तर दुसरीकडे ती त्या अपयशाला दिलेला प्रतिसादही होती. जे मुद्दे वर्तमानपत्र आणि कोर्टात मी मांडले होते तेच या पुस्तकातही मांडले आहेत मात्र त्यांची रचना बदलली आहे (मांडण्याची पद्धत), कँव्हास बदलला आहे, त्यांची व्याप्ती बदलली आहे.
तर एका अर्थाने ही कादंबरी माझ्या लिखाणाचाच पुढचा भाग आहेही आणि नाहीही.
आता आपण या विषयावर बोलतोच आहोत तेव्हा दुसरी एक गोष्टही सांगतो, २००४ला त्सुनामी आली, त्यावेळी मी तेथे नव्हतो पण नंतर बऱ्याच वेळेस जाऊन आलो आणि पाहिलं कि इतर लोकांच खूप नुकसान झालंय पण जारावा हे जे तिथले मूळ आदिवासी आहेत त्याचं काहीच नुकसान झालेलं नाही. आणि अस ही नाही कि त्सुनामी आली ते त्यांनी पाहिले आणि ते पळून गेले, अस जे सांगितले जातंय ते चुकीच आहे. हे आदिवासी जंगलात थोड्या उंचीवर, डोंगरावर राहणारे आहेत त्यामुळे जेव्हा त्सुनामी आली तेव्हा ते समुद्र किनाऱ्यावर नव्हतेच. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला कि एवढी मोठी त्सुनामी आली पण या लोकांना काहीच झाल नाही पण त्यांचा इतिहास जर आपण पहिला तर गेली १५०-२०० वर्ष एक अशी न संपणारी त्सुनामी त्यांच्या मागे लागली आहे. समुद्रातली त्सुनामी येऊन गेली, नाश झाला आणि जीवन पुन्हा सुरुही झाले परंतु हे आदिवासी आणि समाजातील दुसरेही अनेक असे आदिवासी समूह आहेत ज्यांच्यामागे इतिहासच जणू एक त्सुनामी म्हणून मागे लागला आहे जी थांबतच नाही. त्यांच्या मागेच लागलेली आहे. तर अस मला वाटल. हा एक प्रकारचा रूपकात्मक विचार होता. तर असाच विचार करून मी ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीला शीर्षकही आम्ही नंतर दिले ते असेच दिले कि वेव्ह म्हणजे लाट जी आहे ती खरी एक आहे आणि रूपकात्मक ही आहे. तर या कादंबरीच्या बाबतीत अशा या दोन तीन गोष्टी आहेत.
८. काही लोक म्हणतात कि आदिवासींना त्यांच्या पद्धतीने जीवन जगू दिले पाहिजे जसे ते शेकडो वर्षांपासून जगत आलेले आहेत तर काही जण म्हणतात त्यांचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. यावर तुमचे मत काय आणि तसे का हे कृपया आम्हाला सांगा?
मला अस वाटत कि जे आपल्याला करायला हव आणि जी सत्य परिस्थिती आहे ती या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे. मी पुस्तकात ही अस लिहिलंय कि हा प्रश्न जारावा किंवा आदिवासी समाजाचा नाही तर तो आपला प्रश्न आहे कि आपल्याकडे ती समज, किंवा ती बुद्धिमत्ता किंवा ती नम्रता आहे का? आपण जारावा सारख्या समाजाला आदर देऊन, त्यांना बरोबरीचे समजून त्याच्याशी संपर्क करू शकतो का? कारण जर आपण इतिहास पाहिला तर अस लक्षात येत कि हा संपर्क जो आहे तो कधी बरोबरीचा झालेला नाही. नेहमी आपला जो समाज आहे तो या आदिवासींना टाकून बघतो, जसे हे आदिवासी म्हणजे खालचे लोक आहेत. तर हा प्रश्न आहे. जगभरात असे अनेक आदिवासी समूह अशा प्रयत्नात नामशेष झाले आहेत. अंदमानच्या जंगलात ही असे दोन आदिवासी समूह होते जे आता जवळजवळ नामशेष झाले आहेत. १८५० पासून जेव्हा ब्रिटीश आले आणि नंतर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पर्यंत. ग्रेट अंदमानिज आणि ओंगे नावाचे हे आदिवासी समूह होते. ते खूप कमी कमी असे राहिले आहेत. त्यांची संकृती, त्यांचा समाज, त्यांची जीवनपद्धती हे सर्व काही बदलले आहे. ते आधी जसे होते तसे नाहीच राहिले आता. जर तुम्ही हा इतिहास पहिला तर तुम्ही कशावरून म्हणता कि त्यांचे आधुनिकीकरण करून आम्ही त्यांना एक चांगल भविष्य देऊ. आपण जे काही आतापर्यंत केलेलं आहे त्यावरून तर अजिबात तसे वाटत नाही. तर हा प्रश्न महत्त्वाचा आहे परंतु त्याच उत्तर अस सरळ सरळ साध सोप नाहीये. त्यांना काय हवय हे आपल्याला कसे कळणार. हे समजणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते सोपे नाहीये. कोणीतरी म्हणतोय कि त्यांना जंगलात रहायचंय कोणीतरी म्हणतो कि नाही त्यांना बाहेर रहायचंय. आपल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करून नंतर त्यांनी त्यांना काय हव आहे हे ठरवलं तर ते ठीक आहे. पण त्यांच्याशी या विषयावर चर्चा कशी करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण जो पर्यंत आपण त्यांना आपल्या बरोबरीचे समजत नाही तो पर्यंत आपण त्यांच्याशी बोलणार पण कसे? हा प्रश्न तर गुंतागुंतीचा आहेच परंतु तेव्हढी संवेदनशीलताही आपल्यात आहे कि नाही या बद्दलही मला शंका आहे.
Swiftlet-cave
९. या क्षेत्रात काम करतांना तुम्हाला आलेल्या अनुभवांमधील सर्वाधिक संस्मरणीय असे एक दोन अनुभव आम्हाला सांगाल का?
असे खूप अनुभव आहेत. एक अनुभव आठवतो, पुस्तकातही मी त्याचा उल्लेख केला आहे, अंदमान मध्ये साउथ सेंटीनल नावाचे एक छोटे बेट आहे. एक वीस चौरस किलोमीटरचे हे बेट आहे. त्यावर मी खूप लिहिलेही आहे. एका रिसर्च टीम बरोबर १९९८ साली मी तेथे एकदाच गेलो होतो आणि १०-१२ दिवस राहिलो होतो. तेथे कोणी राहत नाही आम्ही तेथे समुद्र किनाऱ्यावर उघड्या जागेवर प्लास्टिक घालून झोपायचो. एकदा दिवसभर फिल्म शुटींगचे काम चालू होते, खूप भटकलो होतो आणि रात्री खूप थकून आम्ही झोपलो होतो. तेव्हा अचानक कोणीतरी प्लास्टिक ओढतंय अस वाटायला लागल. आम्ही खूपच थकलेलो होतो, निदान मी तरी, डोळेही उघडत नव्हते. वाटत होते आता रात्री येथे कोण हे प्लास्टिक ओढत असेल आणि काय त्रास आहे वगैरे. मी खूप कष्टाने डोळे उघडले. पाहतो तर दोनतीनशे किलो वजनाची ग्रीन सी टर्टल (हिरवा समुद्री कासव) त्या प्लास्टिकवरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती! तर झाल अस होत कि त्या समुद्र किनाऱ्यावर ग्रीन सी टर्टल अंडी घालायला येते. आम्ही झोपलो होतो ते बीचच्या एका कोपऱ्यात, तेथे एक ग्रीन सी टर्टल अंडी घालायला आली होती आणि ती ते प्लास्टिक पार करून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. आम्ही एका मानाने तिच्या रस्त्यात होतो. आता ती एक दोन-तीनशे किलो वजनाची कासव होती ती तेथे थोडी अडकल्यासारखी झाली होती कारण त्या प्लास्टिकवरून तिचे पाय घसरत होते आणि ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती म्हणून ते प्लास्टिक ताणले जात होते. मी जेव्हा उठलो आणि बघितलं तर मला एकदम एक धसकाच बसला कि अरे हे काय चाललंय. तर अशी ही माझी अविस्मरणीय आठवण आहे, कोणीही विचारलं तरी हा प्रसंग मला नेहमी आठवतो.
मग ती गेली पुढे?
हो मग आम्ही ते प्लास्टिक काढले, ती पुढे गेली. आपल्या मागच्या पायांनी खड्डा करून त्यात ती अंडे घालत असते तसे तिने ते घातले आणि ती परत गेली.
अंडी घातल्यानंतर समुद्रात परत जातांना एक ग्रीन सी कासव, साउथ सेंटीनल बेट

आणखी एखादा अनुभव सांगाल का?
त्याच ट्रीपमधलाच हा आणखी एक प्रसंग आहे. अंदमानमधल्या मॅनग्रोव्ह जंगलात (समुद्री किनाऱ्यावरील जंगल जे भरतीच्या काळात पाण्याखाली जाते आणि ओहोटीच्या काळात परत कोरडे होते) सर्पंट इगल नावाचा एक पक्षी राहतो. तर आम्ही त्या जंगलाच्या जवळून बोटीने चाललो होतो तेवढ्यात मला त्या पक्ष्याचे एक घरटे तेथे दिसले आणि मी माझ्या मित्रांना म्हणालो कि माझ्याकडे केमेरा आहे, मी जरा त्या घरट्याच्या समोरील झाडावर चढतो आणि त्या घरट्यात अंडी वगैरे आहेत का, कोणी पक्षी येतो का ते बघतो. मी ज्या झाडावर चढलो होतो त्यापासून १५-२० फुटांवर ते झाड होते आणि त्यावर ते घरटे होते. त्या घरट्यात अंडी होती. मी या झाडावर २०-२५ फुट उंचीवर बसलो होतो. त्या घरट्याच्या आसपास मादी वा नर पक्षी दिसत नव्हता, तो कुठेतरी गेला होता किंवा मला पाहून तो तेथे येत नव्हता. मला वाटल थोड्यावेळात मादी किंवा नर येईल ते तेथे बसेल आणि मग मी फोटो काढेल.
मी तेथे असा लपून बसल्यासारखा बसलेलो होतो आणि मला एक शिट्टी सारखा आवाज ऐकू आला, तेव्हढ्यात एका सेकंदाच्या आत माझ्या डोक्यावरून तो पक्षी एखाद्या बंदुकीतून निघालेल्या गोळीच्या वेगात उडत गेला. तो पक्षी माझ्यावर हल्ला करत होता. खर म्हणजे मी त्या ठकाणी असणे हे त्याला त्याच्या घरात अतिक्रमण वाटले असावे, किंवा त्याला काहीतरी धोका असल्याचे वाटले असावे. सुदैवाने मी बचावलो, मी जर थोडासा वर असतो तर त्याचे पंजे नक्कीच माझ्या डोक्यावर लागले असते. हे पक्षी सर्पभक्षी असतात त्यामुळे त्यांची नजर, त्यांच्या हल्ल्यातील तंतोतंतपणा, त्यांचा वेग यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. मी थोड सांभाळून बसलो पण त्याने दोन तीन वेळेस तशीच फेरी परत मारली मग मात्र मी घाबरलो कि हा प्रकार खूप धोकादायक होऊ शकतो म्हणून मग मी खाली उतरून गेलो.
१०. तुम्ही करत असलेल्या डॉक्टरेटबद्दल(पीएचडी) आम्हाला सांगा.
सामाजिक शास्त्रज्ञाने वैज्ञानिकांचा अभ्यास करणे. विज्ञानाचा समाजावर काय परिणाम होतो हे तर आपण नेहमी अभ्यासत असतोच परंतु यात सामाजिक परिस्थितीचा विज्ञानावर, वैज्ञानिकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. यात वैज्ञानिक ज्या समाजातून आला आहे त्या समाजातील परिस्थितीचा त्याच्या संशोधनावर परिणाम होऊ शकतो का? होत असेल तर कसा होतो? हे अभ्यासायचे आहे.
११. तुमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची अशी कोणती गोष्ट किंवा संदेश तुम्हाला आपल्या वाचकांना सांगायला आवडेल?
असे काही सांगणे खूप अवघड आहे पण मला अस वाटत कि खूप प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या गोष्टी उदा. अंदमान येथील आदिवासी, त्यांची जीवनपद्धती, त्यांची संस्कृती यांच्याबद्दल आपल्यात थोडी संवेदनशीलता असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे “at some point or other everybody is a minority and vulnerable”. एका परिस्थितीमध्ये एक माणूस बहुसंख्यांक असतो परंतु दुसऱ्या परिस्थितीमध्ये तोच मायनोरीटी होतो. जारावाच्या जंगलात दुसर कोणीही जगू शकत नाही, त्यांच्या पद्धतीने. मी जर तेथे गेलो तर मी चार दिवसही राहू शकणार नाही. जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा ते चार दिवस राहू शकत नाहीत, किंवा ते मायनोरीटी होतात. जेव्हा आपल्याला असे लक्षात येईल कि समोरच्या माणसाची जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आपलीही होऊ शकते तेव्हा आपण त्याच्याबद्दल थोडे अधिक संवेदनशील होऊ असे मला वाटते. ही गोष्ट समजणे हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची जाणीव आहे.
तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि आज जी परिस्थिती जारावा आदिवासी समूहांची आहे तशी परिस्थिती कधी आपली सुद्धा होऊ शकते, (राजकीय पक्ष, धार्मिक अल्पसंख्याक इत्यादी.) माझी अशी आशा आहे कि आपण जर बहुसंख्यांक असतांना संवेदनशील राहिलो तर समोरचा माणूस देखील तो बहुसंख्यांक आणि आपण अल्पसंख्याक झालेलो असतांना संवेदनशील राहील.     
-परीक्षित सूर्यवंशी
suryavanshipd@gmail.com 
@@@@

दुष्काळप्रवणतेशी लढण्यासाठी महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर केले गेलेले प्रयत्न

परिणीता दांडेकर, अमृता प्रधान SANDRP
अनुवाद-परीक्षित सूर्यवंशी
पिंगोरी गावचा “गणेश सागर” तलाव, गाळ काढल्यानंतरचा. फोटो- dagdushetganapati.org
मोठी धरणे बांधण्याच्या आपल्या धोरणामुळे आणि अलीकडील धरण घोटाळ्यामुळे महाराष्ट्र बदनाम असला तरी जेव्हा पाणलोट क्षेत्र विकास, सहकार पद्धतीने पाणी व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्यांचे समान वाटप या बाबतीतील आद्यप्रणेतांबद्दल चर्चा होते तेव्हा याला देशातील सर्वांत पुरोगामी राज्यांपैकी एक म्हटले जाते. महाराष्ट्र राज्यात कित्येक केंद्र अनुदानीत आणि राज्य अनुदानीत ड्राउट प्रोन एरिया प्रोग्राम (DPAP), इंटिग्रेटेड वेस्टलेंड डेव्हलपमेंट प्रोग्राम (IWDP), आदर्श गाव योजना इत्यादींसारख्या पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमांच्या जोडीला राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, वाघड आणि पालखेडमध्ये सोप्पेकॉमने पाणी वापर संघटनांवर केलेले काम, पाणी पंचायतचे कार्य, एफार्म इत्यादी अशा अनेक यशोगाथा आहेत. या राज्याला या क्षेत्रात अत्यंत निष्ठेने काम करणाऱ्या स्व.विलासराव साळुंके, अण्णा हजारे, पोपटराव पवार, स्व.मुकुंदराव घारे, श्रीमती कल्पनाताई साळुंके यांच्यासारख्या अनेक दिग्गज कार्यकर्त्यांचे भरघोस योगदान लाभले आहे. त्यांनी फक्त पाण्याची उपलब्धता वाढविण्यावरच नव्हे तर उपलब्ध पाणीसाठ्यांचे समानतेने आणि दूरदर्शीपणाने वाटप आणि व्यवस्थापन यांवर भर दिला. तसेच ज्यांच्या मुळाशी समानता, संवेदनशीलता, सामाजिक वास्तविकता आणि पर्यावरणाशी अनुकूल शाश्वत विकास या संकल्पना आहेत अशा सहकारी पाणलोट व्यवस्थापनाच्या अनेक पैलूंवरही त्यांनी भर दिला.
२०१२-१३ मध्ये महाराष्ट्र आतापर्यंत पडलेल्या भयंकर दुष्काळांपैकी एकाला तोंड देत असतांनाही वरील संदर्भांची एक भूमिका होती. या विनाशकारी दुष्काळाने राज्यातल्या काही पाणलोट उपक्रमांना देशोधडीला लावले, ज्यातील काही राज्य सरकार आश्रित तर काही पूर्णपणे अनाश्रीत होते.
पाणलोट किंवा इतर साध्या उपायांनी स्थानिक पातळीवरील पाण्याच्या उपलब्धतेत वाढ करण्याच्या काही यशस्वी प्रयत्नांचा आम्ही अभ्यास केला. “स्थानिक पुढाकार” हे या उदाहरणांतील समान धागा आहे. स्थानिक पुढाकाराला तज्ञांचे प्रेरक मार्गदर्शन आणि सरकारी संस्थांचे पाठबळ लाभले कि सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात हे पुन्हा एकदा अनुभवला आले.
याचवेळी आमचे लक्ष अशा काही तात्पुरत्या पाणलोट उपायांकडेही गेले जे सध्या सरकार आश्रित आहेत. हे तात्पुरते उपाय सहकारी पाणलोट व्यवस्थापन आणि समान पाणी वाटप यांद्वारे होणाऱ्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन प्रयत्नांना पर्याय ठरू शकतात का याचा आम्ही विचार केला. खाली दिलेली उदाहरणे ही कृषिदैनिक “एग्रोवन” मधून घेतली आहेत त्यांच्या कडे मात्र सूचक म्हणून पहिले जावे. हे काम कशाप्रकारे विकसित होत गेले हे समजून घेण्यासाठी आम्ही हे बदल घडवून आणण्यात प्रमुख भूमिका असलेल्या लोकांशी चर्चा केली.
हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार फोटो : Business Standard

दुष्काळप्रवण अहमदनगर भागातील नायगावने गावतळ्यातील गाळ काढला

जिल्हा अहमदनगर आणि तालुका जामखेड असलेले नायगाव हे महाराष्ट्रातील ५००० लोकसंख्येचे एक लहान गाव आहे. जामखेडच्या खैरी नदीवरील खैरी जलसिंचन प्रकल्प हा या गावापासून केवळ 3 कि.मी. अंतरावर असूनही तो नायगावची पाण्याच्या दुर्भिक्षापासून सुटका करत नाही. गेल्या काही वर्षांपासून फेब्रुवारीनंतर नायगावात पाण्याची टंचाई खूपच गंभीर रूप धारण करू लागली आहे आणि गावाचे पाण्याच्या टँकरवरील अवलंबित्वही वाढले आहे.
या गावात एक तलाव आहे – नायगावचा तलाव. १९७२ च्या महाभानायक दुष्काळानंतर जलसंपदा विभागाने बांधलेला. तो ४२ हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेला आहे. परंतु देखभालीअभावी या तलावात गाळ साचला होता आणि त्याच्या पाणी साठवण क्षमतेत मोठ्याप्रमाणावर घट झाली होती. २०१२-१३ चा दुष्काळ हा नायगावसाठी शेवटचा झटका ठरला. गाळाने भरलेला तलाव ज्यात क्वचितच पाणी साठवले जात होते गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत होता. २०१३ च्या उन्हाळ्यात नायगावातील १५०० पेक्षा जास्त लोक हातांनी आणि मशीनने या तलावातील गाळ काढण्यासाठी एकत्र आली. या एकत्रित प्रयासाचा परिणाम तलावातून 3 लाख चौरस मीटर गाळ काढला गेला.  
शेतकरी असल्याकारणाने त्यांना या गाळाचे मूल्य जाणवले आणि मग हा गाळ २५० हेक्टरहून अधिक शेतजमिनींवर पसरवला गेला. शेतकऱ्यांचा उत्साह आणि पुढाकार पाहून जामखेड तालुक्याच्या तहसीलदारांनी या गळावरील रॉयल्टी माफ केली. परंतु या व्यतिरिक्त या प्रयत्नांत कोणतीच सरकारी मदत घेतली गेली नाही. त्यांनी असे का केले? आम्ही पाणलोट समितीचे अध्यक्ष सुरेश उगले यांना विचारले, “२०१२ उत्तरार्ध-२०१३ पूर्वार्धात एकत्र येऊन काहीतरी करावे असे आम्ही ठरवले होते. आम्हाला भीती होती कि जर सरकारच्या MNREGA सारख्या योजनेला मंजुरी मिळण्यास वेळ लागला तर २०१३ चा पावसाळा आमच्या हातून निसटून जाईल. यापुढे आम्हाला एकही पावसाळा गमवायचा नव्हता त्यामुळे सर्व काम आम्ही स्वतःच, स्वेच्छेने केले.”
जामखेडचा ओसाड भूप्रदेश फोटो : jamkhed.wordpress.com
तलावातील गाळ काढण्याबरोबरच गावकऱ्यांनी कृषि विभागासोबत आजूबाजूच्या परिसरात पाणलोटविकासाची कामे केली ज्यात सतत बंधारे खणणे (Continuous Contour Trenching), नाला बिल्डींग आणि गली प्लगिंग इत्यादी कामांचा समावेश आहे. याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत. गाव तलावातील गाळ काढल्यामुळे त्याच्या आसपासच्या ३०-४० विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. शेतकरी प्रत्यक्ष तळ्यातूनदेखील पाणी घेत आहेत. पाणलोटक्षेत्र विकासाच्या कामांमुळेही इतर विहिरींची पाणी पातळी वाढली आणि जमिनीतील ओलावादेखील वाढला आहे. याचा परिणाम म्हणून पिकांत अधिक वैविध्य आले आहे. २०१३ च्या खरीपात जास्तीची ३५ हेक्टर जमीन ही कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, उस अशा बहुविध पिकांखाली आली आणि १८ हेक्टरवर फळबागा लावल्या गेल्या. गावकरी अभिमानाने सांगतात कि ज्या जमिनींवर गाळ पसरवला गेला त्यांची उत्पादकता वाढली. योगेश शिंदेंच्या शब्दांत, “माझ्या हलक्या जमिनीत पिकांची निवड करण्यास मला फारसा वाव नव्हता. परंतु तलावातील गाळामुळे मला जवारी, उडीद आणि इतर चारा पिके घेता आली. यावर्षी आम्ही खरच भाग्यवान राहिलो.”
यासोबतच एक चिंता करायला लावणारी गोष्ट ही घडते आहे ती म्हणजे उसाखालील क्षेत्रातही वाढ होत आहे. याबाबत विचारले असता पाणलोटक्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष म्हणाले, “हो, नव्याने उसाखाली आलेल्या सर्व जमिनींचे सिंचन आम्ही ठिबक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु हे कठीण आहे. सरकारी अर्थसहाय्य ज्यांना त्याची सर्वाधिक गरज आहे अशा गरीबातील गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.” परंतु जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत तर नायगावात जास्त पाणी आणि त्याचबरोबर जास्त पाणी गिळणाऱ्या उसाची लागवडही जास्त असे समीकरण तयार होईल हे स्पष्ट आहे.

पिंगोरी गावाला यावर्षी टँकर्सची गरज नाही!

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी हे गाव तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. ८०% जमीन डोंगराळ आहे आणि फक्त २०% जमीनच मशागतीयोग्य आहे. पुणे क्षेत्रात मोठ्या धरणांची संख्या प्रचंड असली तरी पिंगोरी पर्यंत कोणत्याच कालव्याचे पाणी पोहचत नाही. वीर धरण गावापासून खाली पुढे फक्त १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे परंतु गावाच्या पाणीपुरवठ्यात त्याची काहीच भूमिका नाही. २०१३ मध्ये या गावात तीव्र दुष्काळ पडला. डोंगराळ भागात जमिनी असलेल्या लोकांकडे आपल्या जमिनी विकण्याशिवाय काही पर्यायाच उरला नाही. गावातील एक वयोवृद्ध, बाबासाहेब शिंदे म्हणतात, “पाण्याअभावी गावात उत्पन्नाचे काहीच साधन उरले नव्हते. लोक शहरांमध्ये स्थलांतर करत होते. आम्हाला काहीतरी करणे आवश्यक होते.” परिस्थिती अशी भयानक झालेली असतांना काही गावकरी एकत्र आले. आपल्यासमोरील संकटातून बाहेर पडण्याचा उपाय पाण्याच्या उपलब्धतेत आहे हे सर्वांनीच मान्य केले. पिंगोरीत एक तलाव होता ज्याला देखभालीची आणि गाळ काढला जाण्याची मोठी आवश्यकता होती. जलसंवर्धन विभागाकडे खूप पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु होत नव्हती, निधीचा अभाव हे कारण प्रस्तुत केले जात होते.
कोणताच पर्याय उरला नाही तेव्हा पिंगोरीचे नागरिक एकत्र आले. शेकडो गावकऱ्यांनी NREGA योजनांवर काम करून तळ्यातील गाळ काढण्यासाठी निधी जमवला. जरी त्यांनी एक मोठी रक्कम जमा केली होती तरी गाळ काढण्याचा संपूर्ण प्रक्रीयेसाठी ती पुरेशी नव्हती. यावेळी त्यांना दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टची मदत मिळाली.
अशा काही मदतींच्या आधारे, २०१३ च्या उन्हाळ्यात पिंगोरीने माणसे आणि मशीन्सद्वारे जवळजवळ ४५ दिवस तळ्यातील गाळ काढण्याचे काम केले. गावकऱ्यांनी SANDRPला सांगितले कि एकाच तळ्यातून २,००,००० चौरस मीटर्सहून जास्त गाळ काढला गेला आणि तो शेतजमिनींवर पसरवला गेला. गाळ काढल्यामुळे तळ्याच्या पाणी साठवण क्षमतेतच नव्हे तर त्याच्या पुनर्भरण क्षमतेतही वाढ झाली. पुढे २०१३ चा पावसाळा आला, यावेळी गावतळ्यात जास्त पाणी साठवले गेले आणि आसपासच्या परिसरात देखील पाणीपातळीत वाढ झाली.
कित्येक वर्षांपूर्वी पिंगोरी तलावात जेव्हा जास्त पाणी होते तेव्हा त्यात मासेही होते आणि मोठ्याप्रमाणावर नसली तरी थोड्याफार प्रमाणात का होईना मासेमारीही चालत होती. गाळ आणि दुष्काळाने तिचा नाश केला. परंतु गाळउपश्यानंतर, स्थानिक तरुणांनी या तळ्यात २ लाखांहून अधिक मत्स्यबिजांचे रोपण केले आणि मत्स्यव्यावसायिक सोसायटीची स्थापना देखील केली. गाळ काढण्याबरोबरच गावकऱ्यांनी आजूबाजूच्या डोंगरांत पाणलोटक्षेत्र विकासाची कामेही केली विशेषतः सततचे चरी खोदणे (CCTs) ज्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याला आणि प्रवाह पुन्हा वाहायला लागायला खूप मोठी मदत झाली. गाळ काढण्याचा एकंदरीत फायदा म्हणजे ३०० एकरहून जास्त जमीन जी पूर्वी मशागतीखाली नव्हती ती मशागतीखाली आली आहे आणि चाऱ्याच्या उपलब्धतेतही वाढ झाली आहे.
पिंगोरीच्या एक असामान्य स्त्री सरपंच आहेत ज्यांचे नाव आहे पल्लवी भोसले. सुश्री भोसले सांगतात, “आपल्या घरात प्यायलाही पाणी नसणे, म्हणजे काय हे मला माहित आहे. २०१२-१३ मध्ये सरपंच असतांना मला दर दुसऱ्या दिवशी टँकर बोलवावे लागत होते ज्यामुळे मी खूप दुःखी झाले होते. माझ्या गावातील महिलांना पाण्यासाठी मैलोंमैल चालतांना मी पाहत होते. कितीतरी फालाबागांवर कुऱ्हाड चालवावी लागली होती. हे सर्व खूपच अस्वस्थ करणारे होते. संपूर्ण गाव एकत्र उभा राहिला म्हणून हे घडू शकले.”
या पावसाळ्यात पुरंदर परिसरात २५% हूनही कमी पाऊस पडलेला असतांनाही अजूनपर्यंत पिंगोरीने एकही टँकर मागवलेला नाही.
पिंगोरी तलावात पाणी असतांनाही, पिंगोरीने भरपूर पाणी पिणारी पिके कशी टाळली? “ग्रामसभा म्हणून आम्ही उसासारख्या पाणी खाऊ पिकांना पिंगोरीत परवानगीच देत नाही. आमचे पाणी हे खूप मौल्यवान आहे आणि आम्ही काहीच जणांना जास्त पाणी देऊ शकत नाही.”

मेडसिंगा गाव

तालुका आणि जिल्हा उस्मानाबाद असलेल्या या गावाची लोकसंख्या २७०० आहे. दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष हे मराठवाड्यातील उस्मानाबादचे नित्याचेच लक्षण आहे. आणि मेडसिंगा हे गावही त्याला अपवाद नाही. SANDRP ने २०१२-२०१३ च्या दुष्काळात दर्शविल्याप्रमाणे, लहान गावांना कोरडे ठेऊन उस्मानाबाद-लातूर परिसरातील सर्व मोठ्या धरणांचे पाणी जवळजवळ पूर्णपणे उसाच्या शेतांकडे आणि साखर कारखान्यांकडे वळवले जात आहे.         
या गावात एक तलाव आहे जो गावकऱ्यांद्वारेच २५-३० वर्षांपूर्वी बांधला गेला होता. गावकऱ्यांनी या तळ्यातील गाळ काढण्याचा आणि त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्याचा निश्चय केला.
येथे, जमिनीतील पुनर्भरण वाढविण्यासाठी त्यांनी तलाव पात्रात रिचार्ज शिफ्ट बांधले. हे म्हणजे एक १३मीx७मीx२मी चा खड्डा होता ज्याच्या खाली आणखी एक २फुx२फु चा खड्डा होता ज्यात ७० फुट खोल बोर घेतला गेला. बोरवेलचा पाईप शाफ्टमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर जाड दोरा गुंडाळला गेला. त्यानंतर भेदन सुकर करण्यासाठी शाफ्टला दगड गोट्यांनी भरून टाकण्यात आले.
जवळपास १० वर्षांपूर्वी बांधलेले १६ बंधारेही गावकऱ्यांनी दुरुस्त केले. काही भागातील सिमेंट वाहून गेल्यामुळे हे बंधारे गळत होते. जवळजवळ ७ लाख रुपयांचा खर्च हॉलिस्टिक वॉटरशेड डेव्हलपमेंट आणि महात्मा फुले वॉटर कन्झर्वेशन प्रोग्राम यांच्याद्वारे केला गेला.
तलावातील गाळ काढणे, पुनर्भरण आणि बंधारे सुधार यांचा एकंदरीत परिणाम म्हणून २७ हून अधिक विहिरी आणि ३२ बोअरवेल्सच्या पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाली. जलसंवर्धन विभागाद्वारे बांधले गेलेले दोन पाझर तलाव गावात आहेत. परंतु गाळ साचल्यामुळे ते आपली पाणी साठवण क्षमता गमावून बसले आहेत. कामाच्या पुढच्या टप्प्यात या तलावांतील गाळ काढणे समाविष्ट आहे.

पाण्याची उपलब्धता वाढली म्हणजे सर्वकाही झाले का? 

पिंगोरी, नायगाव, सिन्नर इत्यादीतील लोकनेते मान्य करतात कि पाणलोट विकास ही एक दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे तिचा अर्थ फक्त पाण्याच्या उपलब्धतेत वाढ एवढाच मर्यादित नाही. पाण्याची उपलब्धता अगदी अल्पकालीन उपायांनीही प्रभावित होते ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे परंतु या प्रयत्नांच्या मागे दूरदृष्टी आणि पाणलोट विकासाचा दृष्टीकोण असणे महत्त्वाचे वाटते. दूरदृष्टीने केलेल्या दीर्घकालीन विचाराअभावी, पाणी खाऊ पिके आणि उपलब्ध पाणीसाठ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे एकूण गोळाबेरीज शून्य असा परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्रातील पाणलोट विकास या आपल्या परीक्षणात सोप्पेकॉमने नोंद्विल्याप्रमाणे, पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रम जमिनी असणाऱ्यांना, श्रीमंतांना आणि ज्यांची पंप्स, वक्रनलिका(siphon) इत्यादी वापरण्याची क्षमता आहे त्यांना अनुकुलता प्रदान करून असमानतेला चालना देऊ शकतो.
दुर्दैवाने, मे २०१३ मधील महाराष्ट्र शासनाचा ठराव जो शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाला रुंदीकरण-खोलीकरण आणि अविवेकीपणाने सिमेंट बंधारे बांधण्याचे समर्थन करतो त्याला सहकारी, अंत्योदय प्रक्रिया म्हटले जाऊ शकत नाही. अशास्त्रीय पद्धतीने केले गेलेले प्रवाहांचे खोलीकरण आणि रुंदीकरण हे फक्त उधळपट्टीचेच नाही तर ते पुनर्भरणाला मदत करण्याऐवजी जमिनीची जलधारण क्षमताही कमी करू शकते. खालच्या भागात पाण्याची उपलब्धता, श्रमदानाऐवजी पूर्ण काम फक्त तांत्रिक साधनांद्वारेच करणे याबाबतीतील आणखी प्रश्नही यामुळे उपस्थित होऊ शकतात. पाणलोटक्षेत्र विकास हा व्हेली अप्रोच सारखा आहे ज्यात डोंगर माथ्यापासून उपायांना सुरुवात केली जाते आणि ते बरोबर स्वाभाविकपणे खाली दरीत बांध आणि बंधारे यांच्या स्वरुपात उतरतात. अविवेकीपणाने सिमेंट नाले बांधण्याला काही पाणलोटक्षेत्र विकास म्हणता येणार नाही.
सोप्पेकॉमच्या सीमा कुलकर्णी म्हणतात, “पाणलोट विकास म्हणजे एखाद्या गावासाठी पाणलोट विकासाची योजना किंवा सूक्ष्म पाणलोट विकास यांचा परमोच्च बिंदू होय. अशा योजनेअभावी, तात्पुरत्या उपायांनी काही लाभ होईल याबाबत शंकाच आहे.”
कंत्राटदार-धार्जिण्या महाराष्ट्रात, मग हजारो सिमेंट बंधारे बांधणे यांसारख्या अवाढव्य प्रकल्पांकडे निर्णायक हस्तक्षेप (Critical Intervention) म्हणून पाहिले जाण्याऐवजी एक व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहिले जाते यात काय आश्चर्य! अहवालांनुसार, गेल्या फक्त दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारने कृषि आणि जलसंधारण खात्यांमार्फत ३००० हून अधिक बंधारे बांधले ज्यावर ७०० कोटींहून जास्त रुपये खर्च करण्यात आले. नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार शासन निर्णय आल्यानंतर २०१३-१४ मध्ये घाईघाईने बांधण्यात आलेल्या नाला बंधाऱ्यांपैकी कित्येक पाणी धरून ठेवत नाहीत, काही जालावर्तनाच्या दृष्टीने चुकीच्या जागेवर बांधले गेले आहेत, काही अगोदरच क्षतिग्रस्त झाले आहेत, काही पुरेसा गाळ उपसा केल्याशिवाय बांधले गेले आहेत ज्यामुळे पाणी साठवण क्षमता प्रभावित झाली आहे इत्यादी. अनेक जिल्ह्यांमध्ये यावर सरकारी चौकशी समित्या स्थापण्यात आल्या आहेत.
पिंगोरी, नायगाव, देवनाडी यांच्या ताज्या उदाहरणांच्या अनुभवावरून अथवा राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार यांच्यासारख्या जुन्या यशाकडे पाहून असे वाटते कि पाणलोट विकास हे फक्त मशीन्सच्या मदतीने योग्य ठिकाणी काही बांधकामे उभी करणे यापेक्षा काहीतरी खूप जास्त आहे. ही जितक्याप्रमाणात एक तांत्रिक प्रक्रिया आहे तितक्याचप्रमाणात ती एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रक्रियाही आहे. आणि खरतरं याच पद्धतीने ती अधिक परिणामकारक आहे.
suryavanshipd@gmail.com

शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

माळीण भूस्खलन शोकांतिका पश्चिम घाटाची धोक्याप्रती संवेदनशीलता अधोरेखित करते

परिणीता दांडेकर, अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी

महाराष्ट्रातील आंबेगाव तालुक्यातील माळीण या एका छोट्याशा गावात घडलेली ही शोकांतिका. ३० जुलै २०१४ ला भल्या पहाटे येथे दरडी कोसळली, आतापर्यंत हाती आलेल्या बातम्यांनुसार, या भूस्खलनाने निर्माण झालेल्या प्रचंड मलब्याखाली जवळजवळ ४० घरे गाडली गेली आहेत. वेगवेगळ्या अंदाजांनुसार आतापर्यंत मृतांची संख्या ४४ तर मलब्याखाली अडकलेल्या/दबलेल्या माणसांची संख्या १५० ते ३०० पर्यंत सांगितली जात आहे. बचावकार्य प्रमुखांच्या मते अडकलेल्यांपैकी/दबलेल्या कोणाचीही वाचण्याची शक्यता आता कमीच आहे.
माळीण येथील विनाश फोटो-अतुल कुमार काळे, स्थानिक कार्यकर्ते 
या घटनेला कारणीभूत काही प्रमुख घटक:
खूप जास्त पाउस : हा प्रदेश उत्तर पश्चिम घाटात आहे जेथे पावसाळ्यात खूप जास्त पाउस पडतो. २५ ते ३१ जुलै या आठवड्यात या क्षेत्रात विशेष अतिवृष्टी होत होती. SANDRP ने आपल्या फेसबुक पेजवर २९ जुलैच्या रात्री यासंबंधी धोक्याचा इशारा दिला होता (https://www.facebook.com/sandrp.in). NASA च्या (The National Aeronautics and Space Administration of US) TRMM (Tropical Rainfall Measuring Mission, see:http://trmm.gsfc.nasa.gov/publications_dir/instant_2.html) या संस्थेच्या नोंदीनुसार या आठवड्यात एकूण ६०० मिमीहून जास्त पाउस पडला, ज्यातील जास्तीतजास्त २९ ते ३० जुलै दरम्यान पडला. खर म्हणजे २९ जुलै रोजी २४ तासाच्या पर्जन्य नकाशावर माळीणगावासह आसपासचा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगात दाखविण्यात आला होता, म्हणजेच तिथे १७५ मिमीहून जास्त पाउस पडू शकतो. ही अतिवृष्टीची सर्वोच्च श्रेणी मानली जाते.


आम्ही हा लेख १ ऑगस्ट २०१४ ला लिहित आहोत आणि या क्षेत्रात अजूनही मुसळधार ते अतिमुसळधार पाउस पडत आहे.
Down to Earth चा भूस्खलनापूर्वी “२४ तासांत फक्त ४ मिमी पाउस पडल्याचा” अहवाल हा अत्यंत धक्कादायक आहे, कारण वस्तुस्थिती एकदम वेगळी आहे.  
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अशा अतितीव्र अतिवृष्टीच्या घटनाची वारंवारिता वाढत जाणार आहे, जी अशा प्रदेशांना भूस्खलनासारख्या दुर्घटनांप्रती अधिकच संवेदनशील बनवेल.
माळीण येथील विनाश फोटो-अतुल कुमार काळे, स्थानिक कार्यकर्ते
भूस्खलनाचा इशारा
२९ जुलै २०१४ माळीणला अति मुसळधार पाउस 9 pm IST NASA TRMM
३० जुलै २०१४ माळीणला अति मुसळधार पाउस 9 pm IST NASA TRMM
उत्तर पश्चिम घाटाच्या आसपासच्या प्रदेशांत, अगदी गुजरात पर्यंत जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे NASAच्या TRMMने या क्षेत्राला ३० जुलै रोजी भूस्खालानाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून ठळकपणे दाखविले होते.
खाली दिलेला NASA TRMMचा ३० जुलै २०१४ रोजीचा भूस्खलनाच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्रांचा नकाशा पहा. यात भीमाशंकर आणि माळीण ठळकपणे दाखविले आहेत.
भूस्खलनाची शक्यता असलेली क्षेत्रे, NASA, 6 pm IST ३० जुलै २०१४
धरणाशी संबंध
माळीण गाव हे डिंभे धरणापासून अंदाजे १.५ किमी अंतरावर आहे. सिंचन प्रकल्प म्हणून बांधण्यात आलेले हे एक मोठे धारण असून याचे बांधकाम २००० साली पूर्ण झाले. ३१ जुलै रोजी या धरणात ४४% पाण्याचा जिवंतसाठा होता. अर्थात धरणात १५६ दशलक्ष घनमीटर पाणी होते. धरणातील पाण्याच्या पातळीत होणारे चढउतार आणि त्याच्या कडेच्या क्षेत्रात होणारे भूस्खलन यांचा परस्परसंबंध बऱ्याच लिखाणातून दाखवला गेला आहे. पूर्वी काही भूवैज्ञानिकांनी डिंभे धरणाच्या आसपासच्या भागात भूस्खलनसंबंधी क्रियांत वाढ झाल्याच्या नोंदीही करून ठेवल्या आहेत(http://timesofindia.indiatimes.com/City/Mumbai/More-landslides-likely-in-5km-radius-of-Dimbhe-dam/articleshow/39314716.cms). ही दुर्घटना झाली तेव्हा हे धारण ओसंडून वाहत नव्हते. पण ही गोष्ट ही सर्वज्ञात आहे कि, धरणातील पाणीपातळीत होणारे चढउतार आणि जलनिस्सारण तसेच भूपृष्ठाखालील पाण्याचा प्रवाहांत होणारे बदल, यामुळे धरणे आपल्या कडेच्या भागांत भूस्खलनाला कारणीभूत ठरू शकतात.
डिंभे धरणाची ठळक वैशिष्ट्ये: उंची: ६७.२१ मी., लांबी: ८५२ मी., एकूण पाणी साठवण क्षमता: ३८.२२ दघमी., जिवंतपाणी साठवण क्षमता: ३५.३९१ दघमी., जलाशयाचे क्षेत्रफळ : १७५४.७ हेक्टर.
हे धरण आणि त्याच्या परीचालानाचा या प्रदेशाच्या भूरचनेवर काय परिणाम झाला आणि धरणाचा भूस्खलनाशी असलेला संभाव्य संबंध यांची खोलवर तपासणी होणे आवश्यक आहे.  
डिंभे धरण आणि त्याच्या पाणलोटक्षेत्राजवळील माळीण गावाचे स्थान, गुगल मॅप
या प्रदेशासाठी भूस्खलन पूर्णपणे नवीन नाही
कल्पवृक्ष संस्थेच्याच्या पर्यावरण आणि इतिहासतज्ञ, सायली पलांडे दातार यांच्या म्हणण्यानुसार या क्षेत्रात यापूर्वीही काही भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत (उदा.२००६-०७). या प्रदेशात काही दशकांपासून काम करणाऱ्या शाश्वत या स्वयंसेवी संस्थेचे आनंद कपूर म्हणतात कि त्या पूर्वीही एकदा भूस्खलन झाले होते ज्यात काही गुरेढोरे दाबली गेली होती आणि माणसांना वाचवावे लागले होते. पुण्यापासून ६० किमीवर मावळ तालुक्यातील भाजे गावात २३ जुलै १९८९ रोजी कोसळलेल्या प्रचंड दरडीत ३९ माणसे दगावली होती(http://indianexpress.com/article/india/india-others/before-malin-the-1961-pune-flood-and-the-1989-bhaja-landslide/).
पुणे तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात भूस्खलनासंबंधी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. ऑगस्ट २००४ मध्ये पुण्याजवळील मालेमध्ये भूस्खलनामुळे एक जण मृत्युमुखी पडला, २००४ मध्येच उपसा सिंचन योजनेच्या भुयारात काम करत असतांना दरडी कोसळल्याने एक कामगार मरण पावला, जून २००५ मध्ये घाटघर जलविद्युत प्रकल्पाच्या भुयारात भूस्खलनामुळे ४ कामगारांचा मृत्यू झाला.  
या प्रदेशाच्या भूरचनेत झालेल्या मोठ्या बदलांचा परिणाम
दुर्हम विद्यापीठातील जिओग्राफी विभागाचे धोका आणि जोखीम (hazards and risks) या विषयातील  आंतरराष्ट्रीय तज्ञ, डॉ. डेव्हिड पिटली (Dr. David Petley), यांनी तयार केलेल्या भूस्खलन नकाशानुसार संपूर्ण पश्चिम घाट क्षेत्रात खरोखरच भूस्खलने झाली आहेत.      
डॉ.पिटलींनी माळीणच्या भूस्खलनाबद्दलही लिहिले आहे, पहा- http://blogs.agu.org/landslideblog/2014/07/31/malin-landslide-1/.
SANDRP शी बोलतांना डॉ. पिटली म्हणाले, “येथील मुख्य समस्या जमिनीच्या वापरात झालेले मोठे बदल आणि जंगलतोड या आहेत.” ते पुढे म्हणाले, “येथे मी असे गृहीत धरतो कि जोरदार अतिवृष्टीने या घटनेला चालना दिली, तिला जोड मिळाली ती घट्ट ओली माती, ढालाचा आकार, आणि विकास आणि पाण्याच्या बाबतीत झालेले गैरव्यवस्थापन यांची. हे खरे आहे कि नाही हे तर सखोल तपासणी अंतीच समजू शकेल, मात्र भूरचनेत असे प्रचंड मोठे बदल करण्याचा मोह मात्र टाळायलाच हवा.”
भीमाशंकरच्या आसपासच्या भूरचनेत झालेले बदल  
कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी असलेल्या भीमा नदीचे उगमस्थान, भीमाशंकर हे एक नेत्रदीपक जैवविविधतेने नटलेले, भरपूर पाउस पडणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचेही (Malabar Giant Squirrel) हे निवासस्थान आहे. हा प्रदेश एका साहसी आदिवासी जमातीचे घर ही आहे, ज्यांच्या जीवनपद्धतीवर येथील अभयारण्य निर्मिती, डिंभे आणि इतर धरणांमुळे झालेले विस्थापन, आताचे पवनचक्की प्रकल्प इत्यादींतून अनेक आघात झाले आहेत.
गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील भूरचनेत मोठे बदल झाले आहेत. मशागतीसाठी डोंगरउतारांचे मशीन्सद्वारे टेरेसिंग आणि डोंगर माथ्यावर पवनचक्की प्रकल्पानिमित्त चालणारे काम, ज्यात जंगलतोड करून, डोंगर उतारांना कापून रस्ते बनवले जातात, यातून हे बदल झाले आहेत. माळीण मध्ये असे पवनचक्की प्रकल्प नाहीत परंतु जवळच्या खेड तहसील मध्ये ते आहेत. आंबेगावातही असे प्रकल्प विचाराधीन आहेत.
हे समजून घेणे गरजेचे आहे कि मशागतीसाठी टेरेसिंग करणे हा या क्षेत्रातीलच नव्हे तर पश्चिम घाटातील जास्तीतजास्त आदिवासींचा पारंपारिक पेशा आहे. हा फक्त उदरनिर्वाहाला मदत करणारा महत्त्वाचा घटकच नाही तर त्याच्या मुळच्या अतांत्रिक प्रकृतीमुळे तो आपले प्रमाण, आवाका आणि अंमलबजावणींतही मर्यादित आहे. शाश्वतचे आनंद कपूर यांच्या म्हणण्यानुसार जेसीबी किंवा इतर यंत्रांद्वारे केलेले टेरेसिंग आदिवासींनाही आवडत नाही कारण ते मशागतीसाठी अजिबात अनुकूल नसते.
असे असले तरी, ही सुद्धा एक वास्तविकता आहे कि आता काही सरकारी विभाग टेरेसिंग प्रॉग्रामला चालना देण्यासाठी जेसीबीसारख्या यंत्रांचा वापर करत आहेत. अशास्त्रीय यांत्रिक टेरेसिंग, ज्यात मलब्याचा ढीग लावणे, उतारांची अस्थिरता, जलनिस्सारणावर परिणाम इत्यादींचा समावेश आहे, नैसर्गिकदृष्ट्याच असुरक्षित, अतिवृष्टीग्रस्त या क्षेत्रावरील दुष्परिणामांना कित्येक पटींनी वाढवू शकते.
सरकारी योजना आणि कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या जमीन समतलीकरण गतिविधींचे स्वतंत्र, विश्वासार्ह परीक्षण ताबडतोब केले गेले पाहिजे आणि त्याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत जेसीबीसारख्या मोठ्या यंत्रांचा वापर कमीतकमी केला गेला पाहिजे.
Western Ghats Expert Ecology Panel (WGEEP) आणि High Level Working Group (HLWG) यांच्या अहवालांनुसार या प्रदेशाचे व्यवस्थापन
हे दोन्ही अहवाल माळीणला क्रमशः इकोलॉजीकली सेन्सिटिव्ह झोन १ आणि इकोलॉजीकली सेन्सिटिव्ह एरिया (ESA) मध्ये ठेवतात.
WGEEP द्वारे दिली गेलेली ESZ १ ही उपाधी या क्षेत्रात, स्थानिक लोकसमुहांच्या सहभागाने, अनेक गतिविधींचे नियमन करते. या अहवालाने या भागात भूस्खलनाचा धोका विशेषकरून नमूद केला आहे.
माळीणच्या सभोवती असणाऱ्या पवनचक्कींच्या परिणामांवर टिप्पणी करतांना, WGEEP अहवाल म्हणतो, “प्रचंड जंगलतोडीसह (वन विभागाच्या अंदाजानुसार २८,००० झाडांची कत्तल समाविष्ट), आरक्षित जंगलांना कापत जाणारे मोठे रुंद रस्ते बांधले जात आहेत, अत्यंत चढावाच्या या रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे हा पवनचक्की प्रकल्प मोठ्या प्रमाणावरील जमिनीची झीज आणि भूस्खलनाला कारणीभूत ठरत आहे. यातून निघणारा सगळा मलबा सुपीक शेतजमिनी आणि कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या पात्रात साठत आहे. वन विभागाचा या पवनचक्की चालकांशी संघर्ष होत आहे कारण ते नागरिकांना या डोंगरांवर जाण्यास बेकायदेशीरपणे मनाई करत आहेत. या कंपनीने ‘वन विभागअधिकृत’ असे खोटेच सांगणारे फलक आणि तपासणी नाके उभारले आहेत. अनेक वनवासी या डोंगरांवर परंपरागतरीत्या राहत आलेले आहेत. येथे वन अधिकार कायद्यांतर्गत त्यांना प्राप्त अधिकारांचीच पायमल्ली होत नाहीये तर ज्या डोंगरांवर ते कित्येक शतकांपासून राहत आहेत तेथेच त्यांच्या हालचालींवर बेकायदेशीरपणे निर्बंधही घातले जात आहेत”   
जर पर्यावरण आणि वन मंत्रालय तसेच राज्य सरकारांकडून WGEEP चा अहवाल स्वीकारला गेला असता तर पश्चिम घाटाचे व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक पद्धतीने झाले असते परंतु महाराष्ट्र WGEEP चा असमर्थनीय आधारांवर अत्यंत त्वेषाने विरोध करत आहे आणि पर्यावरण आणि वन मंत्रालयही WGEEP ला फारसे महत्त्व देत नाहीये.
HLWG ही माळीण गावाला इकोलॉजीकली सेन्सिटिव्ह एरियांच्या यादीत समाविष्ट करत असले तरी ही ESA उपाधी या क्षेत्रासाठी फारशी उपयोगी नाही कारण ती फक्त खाणकाम आणि रेड कॅटेगरीतील उद्योगांवरच निर्बंध घालते. या क्षेत्राला धोका निर्माण करणाऱ्या जास्तीजास्त विकासकामांना HLWG द्वारे निर्बंध लागत नाही. अधिक महत्त्वाचे म्हणजे, लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्यासाठी या प्रक्रियेत स्थानिक लोकांचा समावेश HLWG ने केलेला नाही. याबरोबरच HLWG च्या अहवालात या क्षेत्राची भूस्खलन-प्रवण क्षेत्र म्हणून नोंद नाही तर WGEEP अहवाल ही बाब विशेषकरून ठळकपणे मांडतो. यावरून हे स्पष्ट होते कि HLWG चा अहवाल या क्षेत्रात माळीणसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी फारशी मदत करू शकत नाही, परंतु WGEEP चा अहवाल नक्कीच मदतरूप ठरला असता.  
पुढचा मार्ग
उत्तर पश्चिम घाट, जो अति पर्जन्यमान, भरपूर जैवविविधता आणि आदिवासी लोकसमूहांचे वर्चस्व अशा वैशिष्ट्यांनी नटलेला आहे, त्याला आता त्याच्या वाट्याला आलेल्यापेक्षा अधिक संवेदनशील व्यवस्थापकीय दृष्टीकोणाची गरज आहे. WGEEP च्या अहवालाने जरी या क्षेत्राचे अधिक लोकतांत्रिक, न्याय्य आणि लोकाभिमुख व्यवस्थापन करण्याचा मार्ग प्रशस्थ केला असला तरी हा अहवाल राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून देखील लपवला गेला, कमी लेखला गेला आणि शेवटी नाकारला गेला. माळीण सारख्या दुर्घटना या क्षेत्राची धोक्याप्रती संवेदनशीलता अधोरेखित करतात. त्या या क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीच्या बाबीही दर्शवतात. असे असतांनाही या क्षेत्रात उपनगर, पवनचक्की, मोठी धरणे आणि दमणगंगा-पिंजल तसेच पार तापी नर्मदा यांसारखे नद्याजोड प्रकल्प, असे अविचारी प्रकल्प प्रस्तावित आहेत. भीमाशंकर क्षेत्राजवळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका १२ पेक्षा जास्त मोठ्या धरणांसाठी खटाटोप करीत आहेत. यातील काही धरणांसाठी पश्चिम घाटातील डोंगर रांगांमध्ये मोठे बोगदे पाडावे लागतील. खूप सारे धोके आणि दुष्परिणाम असतांनाही या प्रचंड धरणांपैकी अनेक सायंटिफिक इम्पेक्ट असेसमेंट अथवा लोक सुनावणीपासून सहज सुटू शकतील. या प्रकल्पांचा विरोध झाला पाहिजे आणि ते तातडीने रद्द केले गेले पाहिजेत. या प्रकल्पांना समर्थनीय असा आधारच नाही, कारण ज्या शहरांसाठी ही धरणे प्रस्तावित आहेत त्या शहरांमध्ये याशिवाय अनेक इतर पर्याय उपलब्ध आहेत. 
याचप्रमाणे, महाराष्ट्र सरकारची पुणे जिल्ह्यातीलच वेल्हे आणि मुळशी क्षेत्रात तीन मोठी जलविद्युत धरणे बांधण्याचीही योजना आहे. वेल्हे क्षेत्रात आधीच ढाल अस्थिरता (slop instability) दिसून आली आहे आणि हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र IV मध्येही मोडते, यामुळे असा कोणताही विकास प्रकल्प या क्षेत्रात उभारणे अत्यंत धोक्याचे आहे.  
अशा करूयात कि हृदय-पिळवटून टाकणारी माळीणची शोकांतिका आपल्या सर्वांना खडबडून जागे करणारी ठरेल, जी पश्चिम घाटाच्या अधिक संवेदनशील, प्रतिसादी, लोकतांत्रिक आणि शाश्वत व्यवस्थापनाचा मार्ग सुकर करणारी होईल. या दिशेने पहिले पाउल, राज्य आणि केंद्र सरकारने माळीण तसेच संपूर्ण पश्चिम घाटासाठी WGEEP च्या शिफारशी मान्य कराव्यात आणि ताबडतोब त्यांची अंमलबजावणी करावी.  

First published

परिणीता दांडेकर यांचे इतरही लेख वाचण्यासाठी कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्या :
suryavanshipd@gmail.com
@@@@